सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेत राहणाऱ्या माण तालुक्यातील सत्तासंघर्षाचा अखेर अत्यंत नाट्यमय शेवट झाला आहे. माण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत सत्ताधारी भाजपला जोरदार झटका बसला असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. दोन्ही बाजूंकडे समसमान मते पडल्याने काढण्यात आलेल्या ईश्वरचिठ्ठीने राष्ट्रवादीला साथ दिली, ज्यामुळे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
advertisement
माण पंचायत समितीच्या एकूण 10 जागांपैकी 5 जागा भाजपला, तर 5 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या होत्या. त्यामुळे सभापती आणि उपसभापती निवडीत कोणाचे पारडे जड ठरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मतदानावेळी दोन्ही बाजूने 5-5 मते पडल्याने पेच निर्माण झाला. अखेर नियमानुसार ईश्वरचिठ्ठी काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या चिठ्ठीने राष्ट्रवादीच्या बाजूने कौल दिला आणि विक्रम शिंगाडे यांची सभापतीपदी तर प्रियंका जगदाळे यांची उपसभापतीपदी वर्णी लागली.
जयकुमार गोरेंना घरच्या मैदानात धक्का
माण-खटाव हा मतदारसंघ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या निवडणुकीत विजय मिळवून आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अनिल देसाई, प्रभाकर देशमुख आणि अभयसिंह जगताप यांच्या अभेद्य रणनीतीमुळे आणि नशिबाच्या जोरावर राष्ट्रवादीने भाजपच्या तोंडचा घास हिरावून घेतला. या निकालामुळे माण तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांचा जल्लोष
चिठ्ठीचा निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मोठा जल्लोष केला. "अजितदादांच्या नेतृत्वाचा विजय असो" अशा घोषणांनी दहिवडी परिसर दणाणून गेला होता. तर दुसरीकडे, भाजपच्या गोटात मात्र शांतता पाहायला मिळाली.
