काँग्रेसनं बारामतीत उमेदवार दिल्याने सुनेत्रा पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी संताप व्यक्त केला होता. इथून काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू होईल. भविष्यात काँग्रेसला याची किंमत मोजावी लागेल, अशा आशयाचं वक्तव्य पार्थ पवारांनी केलं होतं. पार्थ पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी पसरली होती. यावरून काँग्रेसच्या काही नेत्यांनी उमेदवार मागे न घेण्याची भूमिका घेतली. काँग्रेसने उमेदवार मागे न घेतल्याने बारामतीत निवडणूक होणार, हे जवळपास निश्चित होताना दिसत आहे.
advertisement
मात्र सुनेत्रा पवारांसाठी काँग्रेसमध्ये मोठा वादंग निर्माण झाल्याची माहिती आता समोर येत आहे. काँग्रेसमधील एक गट बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम आहे. मात्र दुसरा गट बारामतीत निवडणूक लढवू नये, या विचारांचा आहे. बारामतीत काँग्रेसनं उमेदवार कायम ठेवला, तर आपण प्रचाराला जाणार नाही, अशी भूमिका काही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्येच दोन गट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी बारामतीतील काँग्रेसची उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात उतरणार नाही, अशी भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेसचे काही नेते दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार आहेत. बारामतीची उमेदवारी काँग्रेसनं मागे घ्यावी, यावर काँग्रेसमधील एक गट अजूनही ठाम आहे. दुसरीकडे, बारामतीत काँग्रेसनं माघार घ्यावी, यासाठी राष्ट्रवादीकडूनही संपर्क सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता बारामतीत काँग्रेस माघार घेणार की, इथं निवडणूक होणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
