उद्धव ठाकरे म्हणाले की, वचननाम्यात आम्ही मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण ठरवणार आहे. मुंबईसारख्याच काही झोपडपट्ट्या इतर शहरात आहेत. त्यांचा विकास कऱणार आहे. मुंबईतलं पळवलेलं वित्तीय केंद्र धारावीत उभारू. मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमीपुत्रांसाठी नोकरी कुठे आहे? मुलींप्रमाणे मुलांनाही मोफत शिक्षण देऊ. तसंच पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार असल्याचं आश्वासन ठाकरेंनी दिलं.
advertisement
महाविकास आघाडीकडून महिलांना ३ हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलंय. ते पैसे कुठून आणणार असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, मी सांगितलं असतं पण ती आयडियासुद्धा पक्षाप्रमाणे ते चोरतील. महागाई वाढत चाललीय, आम्ही दर स्थिर ठेवू असं सांगितलं. तर त्यांनी तेही चोरलं. त्यांना चोरण्याशिवाय काही येत नाही.
योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रात सभा झाली, त्यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिलीय. यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, योगी आदित्यनाथ हे भाजपसाठीच असं म्हणत आहेत. एकत्र आहात तोपर्यंत सुरक्षित आहात असं त्यांना म्हणायचंय.अच्छे दिन कधी येणार लोक विचारतायत पण हे सत्तेतून गेले तर अच्छे दिन येतील.
उद्धव ठाकरेंनी माहिममध्ये सभा न घेण्याचं कारणही सांगितलं. त्यांनी म्हटलं की, माहिम हा शिवसेनेचा मतदारसंघ आहे. तिथं सभा घ्यायची आवश्यकता नाही. मुंबईकरांवर माझा विश्वास आहे. महाराष्ट्राचा माझ्यावर विश्वास आहे. मी इथं गेलो नाही म्हणजे दुर्लक्ष करतोय असं नाही. दिवसाला चार पाच सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ होणार नाही.
शिवसेना ठाकरे गटाची शेवटची सभा शिवाजी पार्कवर होणार का? असं विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी आम्ही परवानगी मागितलीय. हा शिवसेनाप्रमुखांचा स्मरणदिनसुद्धा आहे. याही वर्षी लाखो शिवसैनिक येणार आहेत. तिथं केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. त्याला आचारसंहिता लावू शकत नाहीत. त्यामुळे १७ तारखेला आम्हाला परवानगी मिळावी अशी मागणी केलीय.
ठाकरेंच्या वचननाम्यात दहा गोष्टी असून त्यात आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा मुद्दाही आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतही आश्वासन दिलं आहे. तसंच सरकारी वसाहतीतच कर्मचाऱ्यांना घरे देऊ हा निर्णय पुन्हा घेणार असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.
