वैभवीला बारावीच्या परीक्षेत ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांना वैभवीला डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. वडिलांचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने घवघवीत यश मिळवले. वैभवीने बायोलॉजीमध्ये 98 गुण मिळवले. तर, फिजिक्समध्ये 83 आणि केमिस्ट्रीत 91 गुण मिळवले. गणितामध्येही वैभवीला 94 गुण मिळाले आहेत. वैभवीच्या यशाबद्दल गावकऱ्यांपासून ते शिक्षकांपर्यंत सगळ्यांनी कौतुकाची थाप दिली आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर वैभवी देशमुखनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पाठीवर शबासकी द्यायला, पप्पा हयात नाहीत, अशी भावुक प्रतिक्रिया वैभवीनं दिली आहे.
advertisement
बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर भावना व्यक्त करताना वैभवी म्हणाली की, "दु:ख याचं वाटतं की, माझ्या वडिलांच्या शबासकीची थाप माझ्या पाठीवर मिळणार नाही. त्यावेळी आमची मानसिकता वाईट होती. आम्हाला काहीच सुचत नव्हतं. त्याच काळात महाराष्ट्रानं आम्हाला साथ दिली. थोडा अभ्यास करुन जेवढं शक्य झालं तेवढं केलं. आमचं डायरेक्शन वेगळं होतं. त्या घटनेनं आमचं आख्खं आयुष्य बदलून गेलं. आमचे विचारही बदलले.
"माझ्या वडिलांना न्याय मिळणं, ही पहिली प्राथमिकता आहे. मी माझी 'नीट' परीक्षेची तयारी सुरू होती. नीट क्रॅक करावी, असं वाटतं होतं. मानसिकता नसतानाही पेपर दिला आणि स्कोअर खाली आला. त्या गोष्टींचा विचारही करावा वाटत नाही. गावकऱ्यांच्या आधारामुळे आम्ही आज इथे आहोत," असं सांगताना वैभवीला अश्रू अनावर झाले.