जालना : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे. फक्त 50 जागांवर महाविकास आघाडी पुढे आहे, तर महायुती 233 जागांवर आघाडीवर आहे. एकटी भाजपच स्वबळाच्या जवळ पोहोचली आहे. 132 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 55 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 41 जागांवर आघाडीवर आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 21, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. या विधानसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे, ज्यात बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपेंचाही पराभव झाला आहे.
advertisement
जालन्याच्या घनसावंगीमध्ये राजेश टोपेंना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या हिकमत उढान यांनी राजेश टोपे यांना धूळ चारली आहे. राजेश टोपेंच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला आहे, त्यामुळे राजेश टोपे यांच्या 25 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला आहे. अटीतटीच्या लढतीमध्ये हिकमत उढान विजयी झाले आहेत. घनसावंगीमध्ये 2,500 मतांनी राजेश टोपे यांचा पराभव झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हाही राजेश टोपे हे शरद पवारांसोबत राहिले. तसंच मनोज जरांगे पाटील ज्या आंतरवाली सराटीमध्ये आंदोलन करत होते, त्या मतदारसंघात राजेश टोपेच आमदार होते. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रसद पुरवल्याचा आरोपही राजेश टोपे यांच्यावर करण्यात आला होता. राजेश टोपे यांनी मात्र हे आरोप फेटाळले होते.
