संगमनेर : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा सगळ्यात धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा धक्का बसला आहे. सलग नवव्यांदा संगमनेरमधून निवडणूक लढणाऱ्या बाळासाहेब थोरात यांना नवख्या तरुणाने पराभूत केलं आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे अमोल खताळ जायंट किलर ठरले आहेत. अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरातांच्या सत्तेला सुरूंग लावला आहे.
advertisement
अमोल खताळ यांच्या विजयासाठी विखे पाटील यांनी मोठी ताकद लावली होती. विखेंच्या नियोजनबद्ध प्रचारयंत्रणेमुळे थोरातांना पराभवाचा धक्का बसला. निवडणूक हलक्यात घेणंही बाळासाहेब थोरातांना महागात पडलं. अहमदनगर जिल्ह्याने मागची कित्येक दशकं विखे आणि थोरात संघर्ष बघितला आहे. यंदाच्या लढतीमध्ये विखे पाटलांनी थोरातांवर सरशी केली आहे.
माझ्याविरोधात कोटा प्रचार करणाऱ्या थोरातांच्या दहशतीचं झाकण जनतेने उडवलं, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्या पराभवानंतर दिली आहे. अमोल खताळ या नवख्या उमेदवाराला महायुतीमध्ये शिवसेनेकडून तिकीट मिळालं होतं.
काँग्रेसचं महाराष्ट्रात पानिपत
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं पानिपत झालं आहे. महायुतीने आतापर्यंत 225 जागांवर आघाडी घेतली आहे, तर महाविकास आघाडीला फक्त 55 जागांवर आघाडी आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये भाजपने तीन आकडी जागा मिळवल्या आहेत. भाजप आता 126 जागांवर आघाडीवर आहे, तर शिवसेना 56 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 39 जागांवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 22, उद्धव ठाकरेंची शिवसेना 18 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. तर इतर पक्ष आणि अपक्ष 15 जागांवर आघाडीवर आहेत.
