मुंबई: मागील काही वर्षांपासून शहरांची, जिल्ह्यांची नावे सरकारकडून बदलण्यात येत असल्याचे दिसून आले. विरारच्या नावाबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत आल्याने शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला जात आहे. तर, स्थानिक नागरिक आणि मराठी भाषिकांकडून तीव्र विरोध व्यक्त केला जात आहे.
advertisement
विरारमध्ये 'जय द्वारकाधीश' अशा आशयाचे पिवळ्या आणि निळ्या रंगाचे फ्लेक्स ठिकठिकाणी झळकले आहेत. त्यानंतर विरार स्थानकाचे नाव बदलून द्वारकाधीश नाव करण्याची मागणी सुरू असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असल्याचे समोर आले.
सोशल मीडियावर व्हिडिओ क्लिप्स, पोस्ट्स आणि प्रतिक्रियांमधून हा मुद्दा झपाट्याने व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत विरारचे नाव बदलून द्वारकाधीश करण्यात यावे असा सूर उमटत असल्याचे दिसून आले. एका महिलेने तर विरार हे नाव चांगले वाटत नसल्याने द्वारकाधीश नाव करावे अशी मागणी केली. त्याशिवाय, काहींनी भगवान श्रीकृष्ण यांच्या द्वारकेच्या आधारवर असलेले द्वारकाधीश हे नाव योग्य असल्याचे काहींनी म्हटले. या मुद्द्यावरून उत्तर भारतीय समाजातील काहींनी उघडपणे पाठिंबा दर्शवला असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृत पातळीवर कोणताही प्रस्ताव सादर झाला नसल्याचे समजते.
नामांतराच्या प्रस्तावावर संतापाची लाट...
विरारचे नाव बदलण्यात यावे याची मागणी होत असल्याचा दावा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. स्थानिकांसह मराठी भाषिकांनी याचा विरोध केला आहे. “विरार हे ऐतिहासिक आणि भौगोलिक ओळख असलेलं नाव आहे. नाव बदलण्यामागे नेमका अजेंडा काय?” असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे. तर काहींनी “शहरांची ओळख पुसण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
They want to change Virar's name to Dwarkadesh.
द्वारकाधीश नाव चर्चेत का?
विरारमध्ये गुजरातच्या मूळ द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. मागील महिन्यात या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. हे मंदिर वसई-विरार परिसरातील एक नवीन धार्मिक आणि पर्यटन स्थळ बनले आहे. हे मंदिर पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने, सिमेंट, वाळू किंवा आधुनिक साहित्याचा वापर न करता, केवळ कोरलेल्या दगडांनी बांधले आहे. या मंदिरामुळे विरारचे नाव बदलण्याची मागणी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, विरारच्या नामांतराचा मुद्दा पुढील काळात राजकीय रंग घेण्याची शक्यता असून, शहराच्या ओळखीवर आणि सामाजिक सलोख्यावर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
