राज्यातील हवामानाची सद्यस्थिती
स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पालावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि कोकणात ३८°C पेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. प्रचंड आर्द्रता आणि वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पुढील दोन दिवसांत वाऱ्याची दिशा बदलल्यास थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिवसाच नाही तर रात्री देखील घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंशांच्या जवळ पोहोचले असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पूर्णपणे कोरडे राहणार आहेत.
advertisement
अरबी समुद्रात मोठ्या हालचाली
स्कायमेटच्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर, विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा भागात ९ मार्चपर्यंत ढगाळ वातावरण आणि अतिशय हलक्या पावसाची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्रावर एक 'अँटी सायक्लोन तयार झाला आहे. यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे फिरून येत आहेत.
ही स्थिती जमिनीवरील गरम हवा दाबून धरते, ज्यामुळे तापमान वेगाने वाढते. समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेत आर्द्रता वाढली आहे. जेव्हा तापमान आणि आर्द्रता दोन्ही जास्त असतात, तेव्हा शरीराला प्रत्यक्ष तापमानापेक्षा जास्त उष्णता जाणवते त्यामुळेच मुंबईत जास्त उकाडा जाणवत आहे.
उत्तरेकडून येणारे वारे काय सांगतात?
उत्तर भारतातून येणारे वारे महाराष्ट्रापर्यंत पोहोचेपर्यंत कोरडे होतात. तसेच सध्या राज्यावर कोणतेही मोठे ढगांचे आच्छादन नाही, त्यामुळे सूर्याची किरणे थेट जमिनीपर्यंत पोहोचत असून जमीन अधिक तापत आहे. उत्तरेकडील डोंगराळ भागात वेस्टर्न डिस्टरबन्स सक्रिय आहे, पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे राज्यात थंड वाऱ्यांऐवजी उष्ण वारे सक्रिय आहेत.
