महाराष्ट्रात विकेण्डला हवापालट
या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडून येणारे वारे कमालीचे थंड झाले आहेत. हे वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत असल्याने राज्याच्या विविध भागांत पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा थंडीचा कडाका वाढणार आहे. नाशिक, जळगाव आणि नागपूर पट्ट्यात तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली येऊ शकतो. या जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
पुणे आणि उर्वरित मध्य महाराष्ट्रात कसं राहील हवामान?
पुणे, सातारा आणि कोल्हापूर भागातही पहाटेचा गारवा वाढेल. पुढील २४ ते ४८ तासांत येथे किमान तापमानात मोठी घसरण पाहायला मिळेल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानात फार मोठी घट होणार नसली तरी, आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन हवामानात कोरडा गारवा जाणवेल. हवामान तज्ज्ञांच्या मते, हा थंडीचा जोर २-३ दिवस राहील आणि त्यानंतर तापमानात थोडी वाढ होईल. मात्र, २६ जानेवारीपासून पुन्हा एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स उत्तर भारताला धडक देणार आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम कायम राहू शकतो.
दोन दिवस ढगाळ हवामान राहणार
पश्चिमेकडून येणाऱ्या गरम वाऱ्यांमुळे काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाचं संकट देखील ओढवलं आहे. अहिल्यानगरपासून ते कोकणापर्यंत सात ते आठ जिल्ह्यांमध्ये साधारणत: दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे दिवसा गरम तर रात्री थंड असं वातावरण राहू शकतं. एकूणच राज्यात किमान तापमानात 2 ते 3 अंशांनी चढ आणि उतार होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी काहीसा उकाडा जाणवणार आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
तापमानातील या अचानक होणाऱ्या बदलाचा परिणाम रब्बी पिकांवर, विशेषतः द्राक्ष, कांदा आणि हरभरा या पिकांवर होऊ शकतो. द्राक्ष बागायतदारांनी 'करपा' रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य फवारणी आणि बागेत धूर करून तापमान राखण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
