परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी आपल्यातील सारे मतभेद विसरून महापालिकेला ताकद लावली. दोघांच्या एकत्रित ताकदीमुळे शिवसेनेला शहरात चांगले यश मिळाले. शहराची सामाजिक आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन शिवसेना पक्षाने अधिकच्या संख्येने मुस्लिम उमेदवार दिले. त्याचा शिवसेना पक्षाला फायदाही झाला. २५ नगरसेवकांपैकी तब्बल १३ मुस्लिम उमेदवार निवडून आले. त्यामुळे महापौरपदासाठी अल्पसंख्याक नगरसेवकच असावा, असा त्यांचा आग्रह होता. हाच आग्रह मानून संजय जाधव आणि इतरही वरिष्ठ नेत्यांनी सय्यद इक्बाल यांना महापौरपदाच्या खुर्चीवर बसवले.
advertisement
कोण आहेत महापौर सय्यद इक्बाल?
सय्यद इक्बाल यांना कोणताही राजकीय वारसा नाही. त्यांच्या घरातून आतापर्यंत कुणीही राजकारणात सक्रीय नाही. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. महापालिका निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर प्रचार करून त्यांनी जनतेचा आशीर्वाद मिळवला.
सुखवस्तू कुटुंबात सय्यद इक्बाल यांचा जन्म झाला. सय्यद इक्बाल यांचे भाऊ मोठे कंत्राटदार आहेत. व्यवसायात त्यांनी उत्तम जम बसवला. याच काळात त्यांचा शहरातील अनेक मान्यवरांशी संपर्क आला. महापालिका निवडणुकीदरम्यान सय्यद इक्बाल यांना उभे करण्याचा प्रस्ताव आला. शिवसेनेने तिकीट देण्याची तयारी दर्शवल्यानंतर सय्यद इक्बाल यांची राजकारणात एन्ट्री झाली.
सय्यद इक्बाल हे अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आहेत. सार्वजनिक जीवनात आतापर्यंत त्यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. सर्वच समाजातील मान्यवर मंडळींशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. टोकाच्या विचारसरणीचा त्यांना स्पर्शही नाही. त्यामुळे महापौर म्हणून शिवसेना पक्षाने इक्बाल सय्यद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
बंडू जाधव यांचेही विशेष नियोजन
लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाज बंडू जाधव यांच्यामागे भक्कमपणे उभा राहिला. तसेच विधानसभेलाही मुस्लिम समाजाने आपले वजन शिवसेनेच्या पारड्यात टाकले. त्यामुळे अल्पसंख्याक मतपेढी आपल्यामागे कायम राहावी, याची दक्षता महापौरपदाच्या निवडणुकीत बंडू जाधव यांनी घेतली.
महापौर म्हणून निवड झाल्यानंतर सय्यद इक्बाल काय म्हणाले?
खान आणि बाण हा प्रचार सोडू, आता विकासावर बोलू अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित महापौर सय्यद इक्बाल यांनी दिली. शहरात भरपूर समस्या आहेत, त्या सोडविण्याचा निश्चित प्रयत्न करेन. खासदार संजय बंडू जाधव, आमदार राहुल पाटील यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असेही सय्यद इक्बाल म्हणाले. शहरात ६५ नगरसेवक आहेत, कुणालाही अंतर देणार नाही. पक्ष वगैरे न बघता सगळ्यांना सोबत घेऊन काम करेन, असेही इक्बाल म्हणाले.
