कृष्णा खंडवी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो पेण तालुक्यातील गौळवाडी येथील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी दीपाली आणि तिचा प्रियकर उमेश महाकाळसह अन्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी हत्येची कबुली दिली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत कृष्णा खंडवी यांचा विवाह दीपाली हिच्याशी झाला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच दीपालीचं उमेश महाकाळ नावाच्या व्यक्तीशी प्रेमसंबंध जुळले. हे प्रेमसंबंध सुमारे दोन वर्षांपासून सुरू होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचं होतं. पण कृष्णा हा दोघांच्या लग्नात अडसर ठरत होता. यामुळे आरोपींनी कृष्णाला कायमस्वरूपी दूर करण्याचा कट रचला.
advertisement
इन्स्टाग्रामवरील फेक अकाऊंटवरून टाकला सापळा
आपल्या या क्रूर कटासाठी दीपाली आणि उमेश यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. त्यांनी सुप्रिया चौधरी नावाच्या मैत्रिणीच्या मदतीने इन्स्टाग्रामवर 'पायल' या नावाने एक बनावट अकाउंट तयार केले. या कथित 'पायल'च्या माध्यमातून आरोपींनी कृष्णा खंडवी याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
नागोठणे येथे बोलावून अपहरण
प्रेमसंबंधाच्या नावाखाली 'पायल'ने कृष्णाला नागोठणे येथे भेटायला बोलावले. कृष्णा तिथे आल्यानंतर, दीपाली, उमेश आणि त्यांच्या साथीदारांनी त्याचे अपहरण केले. यानंतर त्याला वासगाव येथील निर्जन जंगलात नेऊन निर्घृणपणे त्याची हत्या करण्यात आली.
पुरावा नष्ट करण्याचा क्रूर प्रयत्न
या हत्येचा कोणताही पुरावा मागे राहू नये यासाठी आरोपींनी अत्यंत क्रूर प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, "हत्येनंतर कृष्णाची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा आणि शरीरावर रसायन ओतलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात पत्नी दीपाली आणि प्रियकर उमेश महाकाळसह अन्य आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.