केंद्र सरकार आता फास्टटॅगचा वापर केवळ टोल भरण्यापुरता मर्यादित ठेवणार नाही. लवकरच पार्किंग शुल्क, इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी आणि मोटार इन्शुरन्स भरण्यासाठीही फास्टटॅग वापरता येणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यासाठी मोठी तयारी सुरू केली असून देशभरात फास्टटॅगचा वापराचा व्याप अधिक वाढणार आहे.
बैठकीत काय ठरलं?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनीने (IHMCL) देशातील आघाडीच्या फिनटेक कंपन्यांसोबत बुधवारी एक विशेष कार्यशाळा घेतली. या बैठकीत फास्टटॅगच्या माध्यमातून नागरिकांना आणखी कोणत्या सुविधा देता येतील, यावर चर्चा झाली. सरकारच्या नव्या प्लॅननुसार भविष्यात वाहनधारकांना पार्किंगचे शुल्क भरताना किंवा इलेक्ट्रिक वाहन चार्ज करताना वेगळे पेमेंट करावे लागणार नाही.
advertisement
New Rules:1 जुलै तारीख नोट करुन घ्या! बँकेपासून ते तिकीटापर्यंत बदलणार 10 नियम
वाहनधारकांना काय मिळणार फायदा?
फास्टटॅग स्कॅन करूनच हे सर्व व्यवहार सहज करता येणार आहेत. एवढंच नाही तर वाहन विम्याचे हप्तेही फास्टटॅगद्वारेच भरता येण्याची शक्यता आहे. असं जर झालंच तर ग्राहकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. प्रत्येक वेळी वेगवेगळे कागदपत्र आणि पेमेंटची कटकट नाही, सगळं एकाच फास्टटॅगवरुन करता आलं तर ते वाहनधारकांसाठी जास्त फायद्याचं होऊ शकतं. मात्र यातून फसवणूक टाळण्यासाठी सरकार कोणता मार्ग काढणार तेही पाहावं लागणार आहे.
देशात किती टोलप्लाझा सुरू आहेत?
याच बैठकीत 'मल्टी-लेन फ्री फ्लो' (MLFF) टोलिंग सिस्टीमवरही चर्चा झाली. यामध्ये वाहनांना टोल नाक्यावर थांबावे लागणार नाही. कॅमेऱ्याद्वारे नंबर प्लेट किंवा फास्टटॅग स्कॅन होईल आणि टोल आपोआप वसूल केला जाईल. यामुळे वाहतुकीचा वेग आणि कार्यक्षमता दोन्ही वाढणार आहेत. सध्या देशभरातील 1728 टोल प्लाझावर फास्टटॅग सुरू आहेत. आणखी काही ठिकाणी फास्टटॅग बसवण्याचे काम सुरू आहे. 98.5 टक्के टोल व्यवहार फास्टटॅगद्वारे होत असून 38 बँकांनी आतापर्यंत 11 कोटीहून अधिक FASTag वितरित केले आहेत.
भारतात रेल्वे भाडं वाढलं, पण कोणत्या देशात रेल्वेचं तिकीट सर्वात स्वस्त?
3000 रुपयांचा फास्टटॅग कुठे चालणार?
नुकतंच सरकारने 3000 रुपयांचा फास्टटॅग पास काढण्याची घोषणा केली आहे. फास्टटॅग पास तुम्ही एक वर्षात कितीही घेऊ शकता. 15 ऑगस्टपासून हा पास तुम्हाला ऑनलाईन घेता येणार आहे. त्यासाठी तुम्ही घरबसल्या अर्ज करू शकता. दुसरं महत्त्वाचं म्हणजे या पास अंतर्गत 200 फेऱ्या तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे जे राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणार आहेत त्यांचे 7 हजार रुपये वाचणार आहेत. महाराष्ट्रात मात्र समृद्धी महामार्ग, अटल सेतू, वरळी सी लिंक, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर हा पास चालणार नाही. महाराष्ट्रात एकूण 87 टोलनाके सुरू आहेत त्यापैकी 18 ठिकाणी हा पास चालणार आहे.
Ration Card E-KYC: रेशन कार्डधारकांनो, 7 दिवसांत हे काम कराच! नाहीतर मिळणार नाही धान्य
नितीन गडकरी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, FASTag मुळे देशातील डिजिटल सेवा आणखी सुलभ आणि सोयीच्या होतील. फिनटेक कंपन्यांसोबत भागीदारी करून आम्ही FASTag ला एक मल्टी युज प्लॅटफॉर्म बनवण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच वाहनधारकांसाठी एका छोट्याशा स्टिकरच्या माध्यमातून अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आता टोलच्या पलीकडेही FASTag ची गरज आणि उपयुक्तता वाढणार हे निश्चित!