अमिता देशपांडे यांनी आयटी क्षेत्रात चार वर्षे काम केले. मात्र लहानपणापासूनच त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करण्याची आवड होती. डोंगर-दऱ्यांमध्ये फिरताना प्लास्टिक कचऱ्याचे वाढते प्रमाण त्यांच्या लक्षात येत असे. इतका टिकाऊ असलेला प्लास्टिक आपण सहज का फेकतो? हा प्रश्न त्यांच्या मनात कायम राहिला. पर्यावरणाबद्दल काहीतरी सकारात्मक काम करावे या उद्देशाने त्यांनी विविध क्लीन-अप मोहिमांमध्ये सहभाग घेतला. पुढे परदेशात जाऊन पर्यावरण विषयाचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी या समस्येवर दीर्घकालीन उपाय शोधण्याचा विचार केला.
advertisement
169 वर्ष जुनी पुण्यातली बेकरी, अजितदादांनाही आवडला होता इथला 'हा' पदार्थ, दुबईतही होतो एक्सपोर्ट!
पुण्यात परतल्यानंतर त्यांनी भोर परिसरात प्लास्टिक वीव्हिंग प्रकल्प सुरू केला आणि त्यातून ‘रिचरखा’ची सुरुवात झाली. या उपक्रमात अशा प्रकारच्या प्लास्टिक कचऱ्यावर काम केले जाते, जे सामान्यतः रिसायकल होत नाही जसे की चिप्सचे पॅकेट्स, वेफर्सचे रॅपर्स, कॅरिबॅग्स इत्यादी. या कचऱ्यापासून विशेष प्रक्रियेद्वारे धागे तयार केले जातात. त्यानंतर चरखा आणि हातमागाच्या साहाय्याने त्या धाग्यांचे कापड विणले जाते.
या कापडापासून पर्स, बॅग्स, ऑफिस वापराच्या वस्तू, तसेच होम डेकोरच्या विविध वस्तू तयार केल्या जातात. सध्या रिचरखातून सुमारे 40 प्रकारची उत्पादने तयार केली जात असून त्यांची किंमत साधारणपणे 400 रुपयांपासून पुढे आहे. या वस्तूंना पर्यावरणपूरक आणि हस्तकला असण्याची वेगळी ओळख मिळत आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याला केवळ कचरा म्हणून न पाहता त्यातून मूल्यनिर्मिती होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
ग्रामीण महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. भोर तालुक्यातील महिलांचे गट तयार करून त्यांना हातमागावर कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. परिणामी अनेक महिलांना गावातच रोजगार मिळाला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.
सध्या पुण्यातील कर्वेनगर येथे रिचरखाचे छोटेसे दुकान असून ग्राहक प्रत्यक्ष भेट देऊनही उत्पादने खरेदी करतात. यासोबतच ऑनलाईन माध्यमातूनही विक्री वाढत आहे. देशासह अमेरिका, युरोप, दुबई, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांतूनही ‘रिचरखा’च्या उत्पादनांना मागणी मिळत आहे. विशेषतः कॉर्पोरेट गिफ्टिंग आणि पर्यावरणाबाबत जागरूक ग्राहकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकास यांचा समतोल साधत रिचरखा आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कचऱ्याचे रूपांतर कलेत आणि रोजगारात करण्याचा हा प्रयत्न भविष्यात शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानला जात आहे.