सरोज तिवाडी या गेली 40 वर्ष मसाल्यांचा व्यवसाय करत होत्या. हा व्यवसाय आता त्यांच्या मुलगा सांभाळत असून, मुलाने जबाबदारी स्वीकारल्यानंतर सरोजताईंना घरी बसून करमत नव्हतं. त्यांच्या मनात सतत विचार येत होता की अजून काहीतरी नवीन करावं. काम केलं, लोकांशी मिळून मिसळून राहिलं की मन प्रसन्न राहतं, अंग हात चालते राहतात त्या मुळे एक वेगळी ऊर्जा मिळते.
advertisement
घरात पडून असलेल्या आय-10 गाडीचा काही उपयोग होत नव्हता. त्यातूनच सुचली भन्नाट कल्पना या गाडीतून पाणीपुरी विक्री सुरू करायची. ही कल्पना प्रत्यक्षात आणताना त्यांना नातवाचा आणि सुनेचा मोठा पाठिंबा मिळाला. पाणीपुरी बनवण्याची तयारी, मसाले, चटण्या, सर्व साहित्य व्यवस्थित केलं आणि वारजे-मुंबई–बंगळूर महामार्गालगत त्यांनी आपली गाडी लावली.
पहिल्या दिवशीच लोकांचा प्रतिसाद पाहून त्या भारावून गेल्या. हे रोज सुरू ठेवणार का? असा प्रश्न ग्राहकांनी विचारला. त्यानंतर रोज संध्याकाळी त्यांच्या गाडीवर ग्राहकांची रांग लागायला लागली. सरोज तिवाडी यांना स्वयंपाकाची आणि लोकांना खाऊ घालण्याची आवड पाहिल्यापासूनच होती. त्यामुळे हा व्यवसाय त्यांच्यासाठी नुसता धंदा नाही तर समाधान देणारा आहे.
त्यांच्या पाणीपुरीची चव वेगळी आहे. मसाल्यांचा व्यवसाय केल्यामुळे त्यांना चविष्ट मसाले बनवण्याचं उत्तम कौशल्य आहे. गाडीतून पाणीपुरी विकण्याची ही कल्पना इतकी वेगळी आहे की ग्राहक आकर्षित होतात. एकदा पाणीपुरी खाल्ली की पुन्हा पुन्हा त्यांच्या गाडीवर येतात.
त्यांच्या या उपक्रमाची सोशल मीडियावरही चांगली चर्चा झाली. प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले, जी आई कुठे काय करते या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती, त्यांनी स्वतः सरोज तिवाडी यांच्या गाडीवरून पाणीपुरी खाल्ली आणि त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या गाडीला आणखी मोठा प्रतिसाद मिळू लागला.
सरोज तिवाडी म्हणतात, मला आयुष्यभर कामाची सवय आहे. नातवाने कल्पना दिली आणि घरच्यांनी साथ दिली म्हणून हे सुरू झालं. लोक आनंदाने पाणीपुरी खातात, त्यांचा प्रतिसाद पाहून खूप समाधान मिळतं. वेळ छान जातो, अंग हात चालतात, मन प्रसन्न राहतं हीच खरी कमाई आहे.
आजच्या काळात अनेक जण निवृत्तीनंतर घरातच निवांत बसणे पसंत करतात. मात्र सरोज तिवाडी यांनी त्यातून वेगळा मार्ग निवडला. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी आपल्या आय-10 गाडीतून पाणीपुरी विक्रीचा नवा व्यवसाय सुरू करून कामाला वयाचं बंधन नसतं हे दाखवून दिलं आहे. त्यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आत्मनिर्भरतेचा आणि कामातून आनंद मिळवण्याचा खरा अर्थ सरोज तिवाडी यांच्या कडे पाहून उमजतो.