गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. 12 वर्षांत शस्त्रक्रियांचा खर्च 250 ते 300 टक्क्यांपर्यंत वाढला आहे! विचार करा, 213 पासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराच्या उपचाराचा खर्च तब्बल 13 पट वाढला आहे. हृदय प्रत्यारोपण 9 पट, यकृत प्रत्यारोपण 7 पट, तर किडनी प्रत्यारोपण 5 पट अधिक महाग झाले आहे. हे आकडे वाचूनच धडकी भरते. एवढे पैसे आणायचे कुठून असंही होतं.
advertisement
आता यात आणखी एक मोठी अडचण आहे. विमा कंपन्या अजूनही त्याच जुन्या पद्धतीने हिशोब करत आहेत. वाढलेल्या खर्चाच्या तुलनेत त्यांचे प्रीमियम फारसे वाढलेले नाहीत. त्यामुळे अनेकदा या कंपन्या महागड्या उपचारांचा भार उचलण्यास कचरतात. याचा थेट फटका बसतो तो सर्वसामान्य नागरिकांना. आज आपल्या देशातील जवळपास 75 टक्के लोक त्यांच्या आरोग्याचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात.
त्यांच्याकडे ना सरकारचा आधार, ना खासगी विम्याचं संरक्षण. त्यामुळे जेव्हा एखादा मोठा आजार येतो, तेव्हा त्यांना कर्ज काढण्याची वेळ येते, असलेली मालमत्ता विकावी लागते किंवा अनेकदा वेळेवर उपचारही मिळत नाहीत. यामागे अनेक कारणं आहेत. एक तर वैद्यकीय क्षेत्रातील महागाई इतर क्षेत्रांपेक्षा जास्त आहे.
दुसरं म्हणजे, रोबोटिक शस्त्रक्रिया, लेझरने होणारे मोतीबिंदूचे ऑपरेशन यांसारख्या आधुनिक उपचार पद्धती खूप महागड्या आहेत. तिसरं कारण म्हणजे वाढती लोकसंख्या, ज्यामुळे उपचार आणि शस्त्रक्रियांची मागणीही वाढली आहे. आणि अर्थातच, खासगी रुग्णालयांचा खर्च. त्यांच्या प्रीमियम सुविधा आणि आलिशान खोल्यांमुळे बिल पाहून सामान्य माणसाला चक्कर येते.
या परिस्थितीत आरोग्य विमा असणं म्हणजे खरंच एक सुरक्षा कवच आहे. जर तुमच्याकडे योग्य विमा असेल, तर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीत तुम्हाला पैशांची चिंता न करता कॅशलेस उपचाराची सोय मिळते. नाहीतर, विचार करा, एका हृदय शस्त्रक्रियेसाठी वर्षभराच्या पगाराएवढा खर्च येऊ शकतो. आजारी पडणं आपल्या हातात नसलं तरी, आर्थिक तयारी करणं नक्कीच आपल्या हातात आहे! त्यामुळे वेळीच चांगला आरोग्य विमा घ्या आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक संकटातून वाचवा. कारण आरोग्य सर्वात मोठी धनसंपत्ती आहे!