आरबीआयने जाहीर केलेल्या नव्या पतधोरणानुसार कोणताही बदल झालेला नाही. रेपो रेट स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचा शेअर मार्केटवर देखील परिणाम झाल्याचं दिसून येत आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की या महिन्यात तुमच्या घराचं किंवा गाडीचं कर्ज स्वस्त होईल, तर आरबीआयने तुमच्या या आशेवर पाणी फिरवलं आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मौद्रिक धोरण समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर आज व्याजाच्या दरांबाबत मोठा निर्णय जाहीर केला. आरबीआयने सलग चौथ्यांदा रेपो रेटमध्ये कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
रेपो रेट ५.२५ टक्क्यांवर स्थिर
गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले की, सध्याचा रेपो रेट ५.२५ टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यापूर्वी व्याजात कपात होण्याचे संकेत दिले होते, मात्र जागतिक परिस्थिती पाहता गव्हर्नरांनी सुरक्षित भूमिका घेण्याला प्राधान्य दिलं आहे.
तुमच्या EMI वर काय परिणाम होणार?
बँका आपले गृहकर्ज आणि इतर किरकोळ कर्जाचे दर आरबीआयच्या 'रेपो रेट'शी जोडतात. रेपो रेट कमी झाला की ईएमआय कमी होतो. मात्र, आता दर स्थिर राहिल्यामुळे. होम लोन आणि ऑटो लोनबाबत तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होणार नाही.ज्यांनी स्वस्त कर्जाच्या प्रतीक्षेत घर खरेदी थांबवली होती, त्यांना आता जुन्याच दराने कर्ज घ्यावे लागेल. गव्हर्नरांच्या मते, पश्चिम आशियातील युद्धसदृश परिस्थितीमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात आहे.
व्याजदर कमी करण्यापेक्षा सध्या देशाची विकास दर टिकवून ठेवणे आणि आर्थिक उपाययोजनांना बळ देणे आरबीआयला अधिक महत्त्वाचे वाटत आहे. बैठकीत सहभागी झालेल्या बहुतांश सदस्यांनी सध्याच्या परिस्थितीत व्याजदर कपात करणे जोखमीचे ठरेल, असे मत मांडल्याने हा निर्णय घेण्यात आला.
ज्या दराने रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांना कर्ज देते, त्याला रेपो रेट म्हणतात. जेव्हा बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात पैसे मिळतात, तेव्हा त्या ग्राहकांसाठीही व्याजाचे दर कमी करतात. मात्र, आता आरबीआयनेच दर स्थिर ठेवल्याने बँकांकडेही व्याज कमी करण्याचा पर्याय उरलेला नाही. पश्चिम आशियात पेटलेलं युद्ध आणि वाढत्या महागाईच्या भीतीमुळे सध्या तरी कोणताही दिलासा मिळालेला नाही. ज्या गोष्टींचे दर वाढले ते पुन्हा कमी होतील याची शाश्वतीही नाही.
