नेमकं प्रकरण काय?
भांडुपच्या तुळशेत पाडा परिसरात राहणारा सिद्धार्थ २२ फेब्रुवारीला दुपारी ३ च्या सुमारास 'खेळायला जातो' असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, रात्र झाली तरी तो परतला नाही. चिंतेत असलेल्या पालकांनी शोधाशोध करून अखेर भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असता, दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला मुलुंडच्या विहार तलावाजवळ सिद्धार्थचा मृतदेह आढळून आला.
advertisement
शवविच्छेदन अहवालाने फिरवले तपासाचे चक्र
सुरुवातीला सिद्धार्थचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, डॉक्टरांच्या पोस्टमार्टम रिपोर्टने सर्वांनाच धक्का दिला. अहवालात नमूद करण्यात आले होते की, सिद्धार्थच्या फुफ्फुसात आणि पोटात पाणी नव्हते, म्हणजेच त्याचा मृत्यू पाण्यात बुडून झाला नव्हता. त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे हा घातपात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
'दादागिरी'चा वचपा काढण्यासाठी कट
पोलिसांनी संशयावरून सिद्धार्थच्या तीन मित्रांना ताब्यात घेतले. हे तिघेही अल्पवयीन असून १४ ते १५ या वयोगटातील आहेत. सुरुवातीला त्यांनी सिद्धार्थ बुडाल्याचा बनाव रचला, मात्र पोलिसांनी चौकशीत पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी सांगितले की, सिद्धार्थ त्यांच्यावर नेहमी दादागिरी करायचा. त्याला धडा शिकवण्यासाठी त्यांनी त्याला तलावाजवळ नेले आणि काठीने डोक्यावर प्रहार केला. तो बेशुद्ध पडल्यानंतर त्यांनी त्याला पाण्यात फेकून दिले.
याप्रकरणी तिन्ही अल्पवयीन आरोपींची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून भांडुप पोलीस अधिक तपास करत आहेत.
