नवी मुंबई : महापालिकेच्या स्थापनेपासून पक्ष कोणताही असो नवी मुंबईवर गणेश नाईक यांचेच वर्चस्व राहिले आहे. ते संपवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत. यावेळच्या निवडणुकीमध्येही दोघांमध्ये सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. येथे महाविकास आघाडीला अस्तित्वासाठी धडपडावे लागत असून, खरी स्पर्धा शिंदेसेना व भाजप अर्थात नाईकांमध्येच सुरू असून शिवसेना - भाजप युतीबाबतचा सस्पेन्स अद्याप कायम असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जागावाटप आणि युतीच्या निकषांवरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद स्पष्टपणे समोर येत आहेत.
advertisement
युतीबाबत शिवसेनेने आपल्याकडील माजी नगरसेवकांच्या वॉर्डवर दावा केला आहे. मात्र भाजपने हा दावा मान्य करण्यास नकार दिला आहे. अकरा वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांच्या आधारे शिवसेना दावा करत असेल, तर ऐरोली आणि बेलापूर हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असल्याने त्या विभागांवर पूर्णपणे आमचाच दावा असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.
दोन्ही पक्षांमधील चर्चा अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत नाही
विधानसभा निवडणुकीत ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात भाजपचे आमदार प्रचंड बहुमताने विजयी झाले असून नवी मुंबईकरांनी भाजपलाच कौल दिला आहे. त्यामुळे या भागांवर दावा सांगणे योग्य ठरेल, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभेत विरोधात भूमिका घेतल्याची सल भाजपला असल्याने ही बाबही युतीच्या चर्चेत मोठा अडथळा ठरू शकते. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील चर्चा अद्याप ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही.
एक बैठक रात्री होण्याची शक्यता
दोनच दिवसापूर्वी युतीसंदर्भात एक बैठक पार पडली असून लवकरच आणखी एक बैठक रात्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र युती कोणत्या आधारावर करायची, हे शिवसेनेनं प्रथम स्पष्ट करावे, अशी ठाम मागणी नवी मुंबईचा भाजप गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या तरी युतीचा चेंडू एकमेकांच्या कोर्टातच फिरताना दिसत आहे .
