गेल्या 30 मिनिटांपासून उपनगरीय लोकल सेवा विस्कळीत आहे. तर 40 ते 45 मिनिटांपासून लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. कल्याण, टिटवाळा, आसनगाव, कसारा, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत आणि खोपोली या ठिकाणी जाणाऱ्या सर्व लोकलला या सिग्नल यंत्रणेच्या बिघाडाचा फटका झाला आहे. ऐन संध्याकाळच्या वेळेतच हा मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे चाकरमान्यांना आज सुद्धा घरी पोहोचण्यासाठी उशीर होणार आहे.
advertisement
ऐन घरी जाण्याच्या वेळीच लोकलचा खोळंबा झालेला आहे. अप आणि डाऊन अशा दोन्हीही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. नेमका जलद की धीम्या मार्गावर हा लोकलचा खोळंबा झालेला आहे, याबद्दलच माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकलसोबतच लांब पल्ल्यांच्या एक्सप्रेसला सुद्धा सिग्नल यंत्रणेच्या खोळंब्याचा फटका बसल्यामुळे लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. सिग्नल यंत्रणा सुधारणेत 40 ते 45 मिनिट किंवा त्याहून अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गेल्या बुधवारी सुद्धा ऐन संध्याकाळच्या वेळी लोकल वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मध्य रेल्वेच्या भायखळा ते चिंचपोकळी स्थानकादरम्यान, लोकल सेवा रखडली होती. चिंचपोकळी ते भायखळा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना एका प्रवाशाचा मृत्यू झाल्यामुळे 15 ते 20 मिनिटे लोकलचा खोळंबा झाला होता. तेव्हा सुद्धा नोकरदारांचा ऐन घरी जाण्याच्या वेळेतच लोकलचा खोळंबा झाला होता. दरम्यान, मध्य रेल्वेवरील सतत खोळंब्याचा प्रश्न केव्हा सुटणार ? हा प्रश्न कायमच अनुत्तरितच राहणार आहे.
