वसई : वसई इथं एका नराधमाने किरकोळ वादाचा राग एका 4 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर काढला आहे. त्याने चिमुकल्याला अमानुषपणे मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या मिरा रोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले आहे.
advertisement
जवळपास वर्षभरापूर्वी आरोपी संदीप पवार आणि जखमी चिमुरडा विघ्नेशचे वडील अतुल कोंढरे यांच्यात वाद झाला होता. रिनोवेशनच्या कामावरून संदीप पवार याने अतुल कोंढरे याच्या आईला शिवीगाळ केली होती. त्याच वेळी अतुल तिथे आला आणि दोघांमध्ये वाद झाला ज्याचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं. अतुलने संदिपला मारलं होतं. याच गोष्टीचा राग संदीप पवार याच्या मनात होता.
नेमकं काय कारण होतं?
हा राग बाहेर काढण्याची संधी त्याला मिळाली ती काल रात्री. सोसायटीमधील सगळी मुलं खेळत असताना अतुल यांचा मुलगा संदीप पवारच्या रिक्षात जाऊन बसला. ते पाहतच संदीप चिडला आणि त्याने थेट मुलाला लक्ष केलं. आधी रिक्षावर आपटलं, नंतर जमिनीवर आपटलं आणि फरफटत इमारतीच्या विंगमध्ये घुसला. विघ्नेशच्या आजीने हे पाहताच संदीपला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने तीला देखील धक्का देत. लाथ मारत खाली पाडलं. तेवढ्यात अतुलचा आणखी एक मित्र मध्ये पडला आणि विघ्नेशला संदिपच्या तावडीतून वाचवलं.
चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक
महत्वाचं म्हणजे संदीप आणि अतुल हे जुने मित्र पण राग मनात धरला आणि होत्याचं नव्हतं झालं. घटनेनंतर जखमी मुलाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मिरा रोड येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या हा चिमुकला ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
परिसरात संतापाची लाट
या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवून आरोपी संदीप पवार याला अटक केली आहे. मुलाच्या वडिलांशी वाद असताना एका बालकावर असा निर्दयी हल्ला केल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.
