पण, रोजच्या धावपळीत आपण कधी हा विचार केला आहे का की, ज्या टॅक्सीने आपण प्रवास करतो, तिची सुरुवात भारतात नक्की कधी आणि कुठे झाली असेल? गुगल मॅप्स आणि हायटेक कार्स नसतानाच्या काळात भारताला पहिली टॅक्सी कुणी दिली? चला तर मग, टॅक्सीच्या या रंजक इतिहासाचा प्रवास करूया.
टॅक्सी सर्व्हिसच्या बाबतीत भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईने बाजी मारली होती. ब्रिटीश राजवटीत मुंबई हे सर्वात मोठे बंदर आणि व्यापारी केंद्र होते. त्यामुळेच शहरी वाहतुकीसाठी आधुनिक साधनांची गरज सर्वात आधी मुंबईत भासली आणि भारतातील पहिली मोटर टॅक्सी सर्व्हिस मुंबईत सुरू झाली.
advertisement
भारतात टॅक्सीची अधिकृत सुरुवात 1911 मध्ये झाली. हा तो काळ होता जेव्हा देश संघटित मोटर ट्रान्सपोर्टच्या दिशेने पहिले पाऊल टाकत होता. जेव्हा शहरे बैलगाड्या आणि घोडागाड्यांच्या युगातून बाहेर पडून 'मशीन'वर चालणाऱ्या गाड्यांकडे वळत होती, तेव्हा टॅक्सीने प्रवासाचा वेग बदलून टाकला. या एका बदलामुळे प्रवासाचा वेळ वाचू लागला आणि आधुनिक वाहतूक व्यवस्थेचा पाया रचला गेला.
भारतातील टॅक्सी सर्व्हिसचे श्रेय कोणत्याही एका विशिष्ट व्यक्तीला दिले जात नाही. मात्र, या टॅक्सी ब्रिटीश वसाहतवादी प्रशासनांतर्गत (British Colonial Administration) सुरू करण्यात आल्या होत्या. अधिकारी, मोठे व्यापारी आणि शहरी लोकांसाठी घोडागाड्यांपेक्षा एक वेगवान आणि जास्त विश्वासार्ह पर्याय उपलब्ध करून देणे, हा त्यामागचा मुख्य उद्देश होता.
मुंबईची जगभरात ओळख असलेली 'काळी-पिवळी' टॅक्सी (Kali-Peeli) खरं तर 1964 च्या आसपास लोकप्रिय झाली. सुरुवातीला फियाट आणि नंतर प्रिमियर पद्मिनी गाड्यांनी मुंबईच्या रस्त्यांवर राज्य केले. काळानुरूप या टॅक्सी केवळ वाहतुकीचे साधन न राहता मुंबईची एक सांस्कृतिक ओळख बनल्या आहेत.
मुंबईनंतर कोलकात्यातही टॅक्सी सर्व्हिस मोठ्या प्रमाणावर विस्तारली. विशेषतः पहिल्या महायुद्धानंतर कोलकाता येथे टॅक्सी व्यवसायाला गती मिळाली. या व्यवसायाला उभे करण्यात आणि तो टिकवून धरण्यात शीख समुदायातील बांधवांनी खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
बैलगाडी ते घोडागाडी आणि घोडागाडी ते आताची हायटेक टॅक्सी सर्व्हिस, भारताचा वाहतुकीचा प्रवास अत्यंत रंजक राहिला आहे. तंत्रज्ञान बदललं असलं, तरी 1911 मध्ये मुंबईच्या रस्त्यावर धावलेल्या त्या पहिल्या टॅक्सीने सुरू केलेली मोबिलिटीची क्रांती आजही अखंड सुरू आहे.
