रुग्णवाहिका ड्रायव्हर जेवायला गेल्यामुळे 25 वर्षीय तरुणाला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली नाही. म्हणून दुर्दैवाने त्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. 2 डिसेंबर रोजी दुपारी 01:37 मिनिटांनी चेंबूरहुन पनवेलकडे जाणारी लोकल 25 वर्षीय हर्ष पटेलने पकडली. तुडुंब गर्दीने भरलेली लोकल हर्षने पकडली तर खरी परंतु त्याला त्याचा पुढचा भविष्यकाळ कदाचित माहित नव्हता. प्रवासादरम्यान हर्षला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तो बेशुद्ध पडला. लोकलमध्ये असलेल्या इतरत्र प्रवाशांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना (GRP) घटनेची माहिती दिली. ती लोकल दुपारी 01:57 वाजता वाशी स्थानकात पोहोचली.
advertisement
पोलीस आणि प्रवाशांनी त्याला स्थानकाबाहेर असलेल्या 108 रुग्णवाहिकेपर्यंत नेले. मात्र, तिथे पोहोचल्यावर धक्कादायक वास्तव समोर आले. रुग्णवाहिका तर होती, पण तिचा ड्रायव्हरच तिथे उपस्थित नव्हता. आपण कर्तव्यावर असल्याचे भान कदाचित त्याला नव्हते. रुग्णवाहिका सोडून तो जेवणासाठी बाहेर गेला होता. सुमारे 15 मिनिटे हर्षला रुग्णवाहिकेत ठेवून चालकाची वाट पाहावी लागली. वेळ निघून जात असल्याचे पाहून रेल्वे पोलिसांनी त्याला आपल्या सरकारी जीपमधून नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात नेले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. हॉस्पिटलमध्ये हर्षला नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
हर्षची बहीण अमिकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत रेल्वे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. तिने म्हटले आहे की, वाशी स्थानकात स्ट्रेचर, व्हिलचेअर किंवा प्राथमिक उपचारांची कोणतीही व्यवस्था नव्हती. प्रवाशांना हर्षला कपड्याच्या सहाय्याने उचलून सबवेमधून न्यावे लागले. सोबतच तिथे एक नाही तर दुसरा रुग्णवाहिकेचा ड्रायव्हरही उपलब्ध नव्हता. मुख्य बाब म्हणजे, जीआरपी चौकीतही तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यांना CSMT च्या DRM कार्यालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील त्रुटी आणि आपत्कालीन परिस्थितीत मिळणाऱ्या वैद्यकीय मदतीतील दिरंगाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासन प्रवाशांच्या जीवाला किती महत्त्व देते, हे आपल्याला पाहायला मिळते.
