पुणेकर उन्हाने होरपळले! लोहगावात ३९ अंशांची नोंद
यंदाच्या हंगामातील ही पहिलीच उष्णतेची लाट असून, अनेक शहरांमधील कमाल तापमान आता ३८ ते ४० अंशांच्या घरात पोहोचलं आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणं कठीण झालं असून रस्ते ओस पडू लागले आहेत.
पुणे शहरात मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात तापमानाने उच्चांक गाठला आहे. लोहगाव आणि कोरेगाव पार्क सारख्या परिसरात पारा ३९ अंशांवर गेला असून, यंदाच्या मार्चमधील हे सर्वाधिक तापमान ठरलं आहे. शिवाजीनगर, पाषाण आणि लवळे परिसरातही तापमान ३७ अंशांच्या वर असल्याने पुणेकरांना दुपारच्या वेळी उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत.
advertisement
अरबी समुद्रातील 'या' बदलामुळे महाराष्ट्र तापला! मार्चमध्येच उष्णतेची लाट येण्याचं नेमकं कारण काय?
या १८ जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने मुंबईसह ठाणे, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या भागात उष्ण आणि दमट वातावरण राहणार असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारी १२ ते ४ बाहेर पडू नका!
वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडू नका. बाहेर पडताना छत्री, टोपी आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात सुरू झालेली ही लाट पाहता, एप्रिल आणि मे महिन्यात परिस्थिती किती गंभीर असेल, याची चिंता आता व्यक्त केली जात आहे.
