अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये धर्म स्वांतत्र्य विधेयकावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी, रााष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडत धर्म स्वातंत्र्य विधेयकाला आमचा विरोध नाही पण, हेतूला आमचा विरोध आहे, अशी भूमिका मांडली. पण, बोलताना त्यांनी शिवराज्यभिषेकावर वादग्रस्त वक्तव्य केलं.
काय म्हणाले आव्हाड?
"हा फुले-शाहू-आंबेडर यांचा महाराष्ट्र आहे, संत तुकाराम, बसवेश्वर, संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना या लोकांनी राज्यभिषेक करू दिला नव्हता. आणि तुम्ही होतात की नव्हता, त्यांनाही क्षुद्र म्हटलं गेलं आम्ही तर क्षुद्र आहोत. शिवरायांचा राज्यभिषेक करताना पायाच्या अंगठ्याने कुमकुम टिळक करण्यात आला होता, असं पुस्तकामध्ये लिहिलं आहे' असं अजब विधान आव्हाड यांनी केली.
advertisement
शंभूराजे देसाई संतापले
"छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख कुठल्या तरी पुस्तकांमध्ये कुणी काय केला आहे. हे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं, असा शिवरायांचा इतिहास आम्ही पहिल्यांदाच ऐकत आहोत. जे वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे, ते लगेच पटलावरून बाहेर काढून टाका, अशी मागणी शंभूराजे देसाई यांनी केली.
आव्हाडांनी महाराष्ट्राची माफी मागावी - दादा भूसे
"जितेंद्र आव्हाड हे आपलं मत मांडलं पण, त्यांनी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोर अपमान केला आहे. शिवरायांचा राज्यभिषेक कुणाच्या पायाने टिळक केला असं कुणी बोलत असेल ते हे अजिबात खपवून घेणार नाही. त्यांना कुणाचं लांगुनचालुन करायचं असेल तर ते त्यांनी करावं, पण सभागृहात अशी भाषा खपवून घेणार नाही. काही समाजात लोक १० बायका करतात, त्यावर आव्हाड काही बोलत नाही, आव्हाडांना शिवरायांचा अपमान करण्याचा कुणी अधिकार दिला आहे, आव्हाडांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे नेते आणि मंत्री दादा भूसे यांनी केली.
आव्हाडांचं निलंबन करा - नितेश राणे
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानामुळे भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे कमालीचे संतापले. सभागृहामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करण्याची हिंमत जितेंद्र आव्हाड यांची कशी झाली. त्यांचं सभागृहातून निलंबन करण्यात यावं, अशी मागणी राणेंनी केली.
आव्हाडांची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ उठला. सत्ताधारी आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करून सभागृह दणाणून सोडलं. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात माफी मागितली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आव्हाडांचं वक्तव्य पटलावरून काढून टाकलं.
