मुंबई वाहतूक पोलिसांनी 2024 मध्ये विशेष मोहिम राबवून अशा नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई केली. या मोहिमेदरम्यान तब्बल 4,189 वाहनधारकांवर ई-चलान आकारण्यात आले. त्यांच्याकडून एकूण 41 लाख 89 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावरून या समस्येचे गांभीर्य स्पष्ट होते.
पोलिसांची कडक कारवाई
विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर थेट कारवाई करत त्यांचे सायलेन्सर जप्त केले. एवढेच नव्हे तर, जप्त केलेल्या हजारो सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवत थेट नाश केला. त्यामुळे पुढे हे उपकरणे पुन्हा बाजारात जाऊ नयेत किंवा कुणाच्या वाहनात बसवले जाऊ नयेत याची काळजी घेतली गेली.
advertisement
दंडात्मक कारवाईसह, दंड न भरल्यास संबंधित वाहनधारकांवर थेट न्यायालयीन नोटीस काढली जाते. काही प्रकरणांमध्ये मोटार वाहन कायदा 198 नुसार अनधिकृत बदल केल्यामुळे गुन्हाही दाखल केला जातो. नियमाप्रमाणे अशा बदलासाठी किमान एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो.
का वाढतो धोका?
फटाका सायलेन्सरमुळे होणारा कर्णकर्कश आवाज केवळ त्रासदायक नसतो तर तो आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरतो. सततचा आवाज कानांवर ताण आणतो, तसेच वयोवृद्ध आणि लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होतो. त्यातच वेगाने वळण घेत दुचाकी चालवणे, स्टंटबाजी करणे या सवयींमुळे अपघातांची शक्यता प्रचंड वाढते.
सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत असे सायलेन्सर असलेल्या बाईक मोठ्या संख्येने दिसून येतात. या गोंगाटामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, तसेच रस्त्यावर इतर वाहनधारकांचा तोल जाऊन अपघात घडण्याची शक्यता वाढते.
नागरिकांना त्रास
मुंबईतल्या गजबजलेल्या भागात रात्री उशिरा किंवा पहाटे लांबवरून येणाऱ्या अशा कर्णकर्कश आवाजाच्या बाईक लगेच ओळखता येतात. झोपमोड होणे, शाळा-कॉलेजच्या मुलांचे लक्ष विचलित होणे, आजारी रुग्णांचा त्रास वाढणे अशा अनेक समस्या उद्भवतात. विशेषतः हॉस्पिटल, शाळा, निवासी वसाहती अशा संवेदनशील ठिकाणी हा त्रास तीव्रतेने जाणवतो.
पोलिसांची सततची मोहीम
मुंबई पोलिसांकडून अशा नियमभंग करणाऱ्यांवर वारंवार कारवाई केली जाते. तरीही काही जण "स्टाइल" किंवा "हौस" म्हणून असे सायलेन्सर वापरतात. पोलिसांनी मात्र स्पष्ट केले आहे की, अशा वाहनधारकांना कुठलीही सूट दिली जाणार नाही. भविष्यातही ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
नागरिकांनी काय करावे?
नागरिकांनी अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकी दिसल्यास त्वरित वाहतूक पोलिसांना माहिती द्यावी. तसेच वाहनधारकांनी स्वतःहून नियम पाळून वाहन चालवावे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहनामध्ये अनधिकृत बदल आढळल्यास दंड आकारला जातोच, तसेच गंभीर प्रकरणांमध्ये संबंधितांवर गुन्हाही दाखल केला जातो.
