नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पोलो कार पुण्याहून मुंबईच्या दिशेनं अत्यंत वेगानं येत होती. एक्सप्रेसवेवरील किलोमीटर १० जवळील कळंबोली हद्दीत आली असता, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. वेग जास्त असल्यानं कार रस्त्यावरच अनेकवेळा उलटली. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. गाडीतील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
advertisement
या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करत होते. दुर्दैवाने, यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी प्रवाशाला तातडीने पनवेल येथील एमजीएम (MGM) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे.
अपघातातील तिन्ही मृतांचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांचे मृतदेह खालापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक कोंडी फोडण्याचे काम केलं. काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र आता ती पूर्ववत करण्यात आली आहे. भरधाव वेग हेच या अपघाताचे प्राथमिक कारण असल्याचे बोलले जात आहे.
