सोसायट्या, झोपडपट्ट्या आणि रुग्णालयांवर परिणाम
मुंबईतील अनेक गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या, लहान उपहारगृहे, रुग्णालये, मॉल्स, बांधकाम प्रकल्प आणि रेल्वे प्राधिकरण यांना टँकरवर अवलंबून राहावं लागतं. या टँकर बंदमुळे सर्वच ठिकाणी मोठ्या अडचणी निर्माण होण्याची चिन्हं आहेत. आधीच मुंबईचा पाणीसाठा केवळ 30 टक्क्यांवर आला असून, आता टँकर सेवा बंद झाल्यामुळे अपुऱ्या पाण्याच्या संकटाचा सामना सामान्य मुंबईकरांना करावा लागणार आहे.
advertisement
महत्त्वाचे प्रकल्प ठप्प होण्याच्या मार्गावर
नेव्हल डॉकयार्ड, मेट्रो प्रकल्प, आरएमसी प्लांट्स आणि रस्त्यांच्या कामांच्या ठिकाणी रोज टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या बंदीमुळे हे प्रकल्पही ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
टँकर मालकांचे प्रशासनाला सवाल
टँकर असोसिएशनच्या मते, सध्या 250 दशलक्ष लिटर क्षमतेच्या टँकरद्वारे मुंबईत दररोज पाणीपुरवठा होतो. मात्र जाचक अटी आणि परवानग्यांच्या अडचणींमुळे टँकरचालक आणि मालक हैराण झाले आहेत. "आमच्यावर इतके निर्बंध असतील आणि आम्हालाच पाणी मिळणार नसेल, तर व्यवसाय कसा करायचा?" असा सवाल टँकर मालकांनी उपस्थित केला आहे.
तसेच, महापालिकेने अनेक विहिरी आणि बोअरवेल मालकांना एनओसी नसल्यास सेवा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पर्यायी व्यवस्था असतानाही ती बंद केल्याने मुंबईकरांवरचा ताण आणखी वाढणार आहे. मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनचे प्रवक्ते अंकुर शर्मा यांनी सांगितलं की, शासन व पालिका प्रशासनाशी संवाद साधूनही अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही.
दरम्यान, आहार संघटनेचे प्रतिनिधी निरंजन शेट्टी यांनी स्पष्ट केलं की, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. ते महापालिकेच्या अधिकृत पाण्याच्या मीटरद्वारे व्यावसायिक दराने पाणी घेतात, त्यामुळे टँकर सेवेवर त्यांचा अवलंब नाही.
हॉटेल्सना नाही अडचण, पण लहान विक्रेत्यांचे काय?
या निर्णयाचा मोठा फटका हॉटेलला बसणार नाही. मात्र, रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थ विकणाऱ्या छोट्या विक्रेत्यांवर आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर मात्र याचा मोठा परिणाम होणार आहे. या ठिकाणी प्रामुख्याने टँकरच्या माध्यमातून पाणी मिळतं, आणि टँकर सेवा बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते.