मुंबईकरांचा वेळ वाचणार
मुंबईतील विक्रोळी उड्डाणपुलाचे काम नियोजित कालावधीत म्हणजेच 31 मे 2025 रोजी पूर्ण झाले. पूर्व उपनगरातील विक्रोळी येथील रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलामुळे मुंबईची पूर्व आणि पश्चिम बाजू जोडली जाणार आहे. तसेच या पुलामुळे विक्रोळी पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि विक्रोळी पूर्व बाजूकडील पूर्व द्रुतगती महामार्ग जोडले जातील. त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवास वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत होणार आहे.
advertisement
Mumbai Rain: ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार, 24 तास झोडपणार, मुंबई-ठाण्याला हायअलर्ट
कसा आहे पूल?
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांच्या नेतृत्वाखाली विक्रोळी पूल तयार झाला आहे. पूल विभागाच्या समन्वयाने पुलाची उभारणी, स्थापत्य आणि अनुषंगिक कामे पूर्ण झाली आहेत. विक्रोळी रेल्वे मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाची एकूण रुंदी 12 मीटर तर लांबी 615 मीटर इतकी आहे. त्यापैकी 565 मीटरची उभारणी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केली आहे. तर उर्वरित 50 मीटर लांबीपर्यंतची उभारणी मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
पूल वाहतुकीसाठी उपलब्ध
विक्रोळी पुलाच्या एकूण 19 स्तंभांपैकी पूर्वेकडील बाजूस 12 तर पश्चिमेकडील बाजूस 7 स्तंभ आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते, मार्गिकांवरील कॉंक्रिट, ध्वनिरोधक, अपघातरोधक अडथळा, रंगकाम आणि मार्ग रेषा आखणी आदी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. हा पूल निर्माण करण्यासाठी एकूण 180 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.