Mumbai Rain: ताशी 60 किमी वेगाने वारे वाहणार, 24 तास झोडपणार, मुंबई-ठाण्याला हायअलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Weather: राज्यात पावसाची तीव्रता वाढली असून कोकणात आज अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि ठाण्याला देखील हवामान विभागाने 24 तासांसाठी धोक्याचा इशारा दिला आहे.
advertisement
मुंबई शहरात पहाटेपासूनच आकाश ढगांनी व्यापलेले असून सकाळी 8 नंतर हलक्या सरींची सुरुवात होईल. दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आज मुंबईत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार सरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाने मुंबईसह उपनगरांत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
advertisement
नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरणासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नवी मुंबईमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअसपर्यंत राहील तर किमान तापमान 25 अंशांच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहणार असून वाशी, ऐरोली, घनसोली, बेलापूर या भागांमध्ये सकाळी हलक्या सरी आणि दुपारी जोरदार पाऊस होईल.
advertisement
पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघरमध्ये देखील ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहतील. तर विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विक्रमगड, जव्हार, डहाणू व तलासरी या भागात हवामान अधिकच अस्थिर राहील. दुपारच्या वेळी तापमान वाढून उष्णता जाणवू शकते, परंतु पावसाच्या सरीमुळे संध्याकाळनंतर थोडा गारवा निर्माण होईल.
advertisement
कोकण विभागाला आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस झोडपून काढणार आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना 24 तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला असून सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट असणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल. समुद्र किनाऱ्यालगतच्या भागांमध्ये समुद्र खवळलेला राहणार आहे.









