शिमगा सणासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना नोकरदारांना आता कोकणामध्ये जाण्याचे वेध लागले आहेत. अनेक नोकरदार मुंबई गोवा महामार्ग किंवा रेल्वेने आपलं गाव गाठत आहेत. सणानिमित्त कोकणवासीयांसाठी एसटी महामंडळाने तब्बल 198 जादा एसटी बसेसच्या फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार म्हणजेच 28 फेब्रुवारीपासूनच कोकणवासीय कोकणामध्ये दाखल व्हायला सुरूवात झाले आहेत. मुंबईसह ठाणे आणि पालघरमधून ज्यादाच्या एसटी बसेस चालवल्या जाणार आहेत. 27 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत वेगवेगळ्या आगारांतून विशेष एसटी धावणार आहेत. शनिवार आणि रविवारी सर्वाधिक एसटी कोकणामध्ये रवाना होणार आहेत.
advertisement
बसेसच्या सर्वाधिक कुठून होणार?
कोकणामध्ये जाण्यासाठी 198 पैकी सर्वाधिक बसेसच्या फेऱ्या मुंबई आणि ठाण्यातूनच केल्या जाणार आहेत. ठाण्यातून 79 फेऱ्या होणार असून त्यापैकी 71 फेऱ्यांचे प्री- बुकिंग करण्यात आले आहे. मुंबईतून 62 फेऱ्या होणार असून 37 फेऱ्यांचं प्री- बुकिंग झाले आहे. पालघरमधून 24 फेऱ्या होणार असून या सर्व फेऱ्या ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत आणि रायगड विभागातून 33 फेऱ्या होणार असून त्या अजूनही शिल्लक आहेत. त्यांचं बुकिंग पूर्ण झालेलं नाही. दरम्यान, एकूण 198 फेऱ्यांपैकी 141 फेऱ्या ह्या साध्या फेऱ्या असतील, तर इतर 57 फेऱ्या ग्रुप बुकिंगमधून होणार आहे. ज्यांनी एकत्र बुकिंग केली आहे, त्यांच्यासाठी त्या बसेस असतील. 198 बसेस पैकी सध्या 150 हून अधिक बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल झालेले आहे. एसटी महामंडळ जास्त फेऱ्या करत असल्यामुळे कोकणवासीयांना दिलासा मिळाला आहे.
