कोटा : देशात तरुणाईच्या आत्महत्या हा एक चिंतेचा विषय बनत चालला आहे. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हॉस्टेलवरुन टेस्ट द्यायला निघालेल्या एका 16 वर्षांच्या मुलाने धक्कादायक निर्णय घेतला. तब्बल 9 दिवसांनी त्याचा मृतदेह आढळ्यानंतर मोठी खळबळ उडाली.
एज्युकेशन सिटी म्हणून ओळख असलेल्या राजस्थानमधील कोटा याठिकाणी देशभरातील विद्यार्थी इंजीनिअरिंग आणि मेडिकलच्या तयारीसाठी येतात. काही वेळा कुटुंबायांच्या तणावामुळे हे विद्यार्थी तणावात येतात. त्यामुळे डिप्रेशनमध्ये येऊन अनेक विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करतात. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना घडली.
advertisement
परीक्षा देण्याच्या बहाण्याने वसतिगृहातून निघून गेलेल्या विद्यार्थ्याचा मृतदेह तब्बल 9 व्या दिवशी गरडिया महादेव मंदिर परिसरात सापडला. त्याने 100 फूट उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली. त्याचा मृतदेह दगडांवर दोन झाडांमध्ये अडकला होता. ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळला, ती जागा धोक्याची होती. रचित असे आत्महत्या केलेल्या 16 वर्षांच्या मुलाचे नाव आहे. तो मध्यप्रदेशातील राजगढच्या ब्यावरा येथील रहिवासी आहे. तो एका वर्षांपासून कोटा येथे राहून जेईईची तयारी करत होता. रविवारी 11 फेब्रुवारीला दुपारी हॉस्टेलमधून तो टेस्ट देण्याच्या बहाण्याने निघाला होता. बॅगही सोबत होती. मात्र, सोमवारी त्याची बॅग, चप्प, दोरी, चाकू गरडिया महादेव मंदिराजवळ मिळाले.
गरडिया महादेव मंदिरात टिकिट विंडोवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एंट्री तिकिट घेताना त्या फोटो कैद झाला होता. तसेच त्याच्या कुटुंबीयांना त्याच्या खोलीची चौकशी करताना एक रजिस्टर मिळाले होते. यामध्ये गरडिया महादेव मंदिरात जाण्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे मागील 8 दिवसांपासून तब्बल 40-50 जण कुटुंबीय त्याचा शोध घेत होते.
9 दिवसांनी मिळाला मृतदेह
रचितचे वडील जगनारायण यांनी सांगितले की, 9 दिवसांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह मिळाला. शवागारात मृतदेहाचे शवविच्छेदन सुरू असताना विद्यार्थ्याच्या वडिलांनीही पोलिसांवर आरोप केले. ते म्हणाले की, सोमवारी शोध सुरू असताना आम्ही बंदुका आणि शस्त्रे असलेल्या पोलिसांना कुटुंबासह खाली पाठवण्यास सांगितले होते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्याने यासाठी नकार दिला. खाली एसडीआरएफची टीम जाते. मी त्यांना माझ्या जबाबदारीखाली आणले आहे. त्यांना खाली पाठवण्याचा धोका मी घेऊ शकत नाही, कारण खाली धोका आहे, असे उत्तर वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले.
कुटुंबातील सदस्यच खाली गेले आणि रचितचा मृतदेह शोधून काढला. पोलिसांची टीम फक्त वरवर शोधत होती. जर पोलीस सक्रिय असते तर मृतदेह मिळायला 9 दिवस लागले नसते. पोलिसांनी तप्तरतेने काम केले नाही. आम्ही 24 जण खाली गेलो. याठिकाणी 1 किमी शोध आधीच घेतला होता. यानंतर आम्ही आणखी 1 किमी शोध पुढे घेतला. आमचे जावई पोलीस आहेत. त्यांनी शोध घेतला. जवळपास एक ते दीड किमी दूर असलेल्या ठिकाणी दुर्गंध आल्यावर ते मृतदेहाजवळ गेले असता त्यांना रचित मृतदेह झाडात अडकलेल्या अवस्थेत मिळाला.
जिल्हाधिकारी डॉ. रविंद्र गोस्वामी यांनी सांगितले की, कोटामध्ये लाखोंच्या संख्येने मुले शिकायला येतात. मुलांना तणावातून बाहेर पडण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा परिस्थितीत यातून मुलांना वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वसतिगृहाचे प्रशिक्षक प्रशासन सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामध्ये हळूहळू नक्कीच सुधारणा होईल, असे ते म्हणाले.
