बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध शीतला माता मंदिर परिसरात अचानक झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले. चैत्र महिन्यातील शेवटचा मंगळवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती.
बिहार शरीफमधील मघडा भागात असलेल्या माता शीतला अष्टमीच्या दरबारात मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने मंदिरात अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी होती. सकाळच्या सुमारास अचानक काही कारणास्तव लोकांमध्ये अफरातफरी माजली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर भीषण चेंगराचेंगरीत झाले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी बिहार शरीफमधील मॉडेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तातडीनं मंदिर परिसर रिकामा करण्याचे काम सुरू आहे.
