नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रूपा हणमंत गौडर असे या महिलेचे नाव असून ती या घटनेतून बचावली आहे. समृद्धी (५ वर्षे), प्रीतम (४ वर्षे) आणि सुक्षित (२ वर्षे) अशी मृत मुलांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवारी सकाळी १० वाजता रूपाचा पती हणमंत आपल्या आईला (सासू) गावातील मंदिरात सोडून कामावर गेला होता. सकाळी १० ते दुपारी १ या दरम्यान घरात कोणीही नसल्याची संधी साधून, रूपाने रागाच्या भरात आधी तिन्ही मुलांना गळफास लावला आणि त्यानंतर स्वतः डिझेल पिऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला.
advertisement
असा समोर आला प्रकार...
दुपारी १ वाजता हणमंत घरी परतला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. आत गेल्यावर तिन्ही मुले मृतावस्थेत आढळली, तर रूपा बेशुद्ध पडलेली होती. तिला तातडीने बागलकोट येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिस तपास आणि कारवाई
बागलकोटचे जिल्हा पोलीस प्रमुख सिद्धार्थ गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कौटुंबिक कलह आणि पती हणमंत व सासू रेणव्वा यांच्या छळाला कंटाळून रूपाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे. सध्या रूपा बेशुद्ध असून, ती शुद्धीवर आल्यानंतर तिचा जबाब नोंदवला जाईल. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,' असे त्यांनी सांगितले.
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
