मुकेश अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स पुढील पाच वर्षांत असममधील गुंतवणूक चारपट वाढवून ५०,००० कोटी रुपयांपर्यंत नेणार आहे.रिलायन्स इंडस्ट्रीजच्या असमसाठी पाच प्रमुख प्राधान्यक्रम
असमला तंत्रज्ञान आणि AI साठी सक्षम करणे
“जिओमुळे असम आता केवळ 2G-मुक्त नाही तर 5G-युक्त झाला आहे. असमच्या लोकांनी जिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. रिलायन्स आता असममध्ये AI-रेडी डेटा सेंटर स्थापन करणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना AI सहाय्यक शिक्षक, रुग्णांना AI सहाय्यक डॉक्टर, आणि शेतकऱ्यांना AI सहाय्यक मार्गदर्शन मिळेल. असममधील तरुण 'घरून शिकून, घरून कमवू' शकतील," असे अंबानींनी सांगितले.
advertisement
असमला हरित ऊर्जा केंद्र बनवणे
“रिलायन्स असममध्ये कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) निर्मितीसाठी दोन जागतिक दर्जाच्या केंद्रांची स्थापना करेल. ही केंद्रे दरवर्षी ८ लाख टन बायोगॅस निर्मिती करतील, जे दररोज २ लाख प्रवासी कार्सना इंधन पुरवण्यास पुरेसे असेल," अशी माहिती अंबानींनी दिली.
असममधील कृषी उत्पादनांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्थान देणे
रिलायन्स असममध्ये मेगा फूड पार्क उभारणार आहे, ज्यामुळे असममधील भरपूर कृषी आणि बागायती उत्पादनांना मूल्यवर्धन मिळेल. याशिवाय, असममध्ये आधीच कॅम्पा कोला साठी अत्याधुनिक बॉटलिंग प्लांट स्थापन करण्यात आले आहे.
रिलायन्स रिटेल स्टोअर्सची संख्या दुप्पट करणे
सध्या असममध्ये ४०० रिलायन्स रिटेल स्टोअर्स आहेत. अंबानींनी घोषणा केली की ही संख्या लवकरच ८०० पर्यंत नेली जाईल, ज्यामुळे स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
असममध्ये हाय-एंड हॉस्पिटॅलिटीचा विकास
“रिलायन्स असमच्या केंद्रस्थानी सात-तारांकित ओबेरॉय हॉटेल उभारणार आहे. यामुळे असमच्या पर्यटन उद्योगाला मोठी चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थाही बळकट होईल,” अंबानींनी सांगितले.
असमच्या तरुणांसाठी रोजगाराच्या अमर्याद संधी
या पाच प्रकल्पांमुळे असममधील तरुणांसाठी दहा हजारो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहेत. स्थानिक तरुणांना घराजवळच उच्च दर्जाची नोकरी मिळण्याची सुवर्णसंधी निर्माण होईल.
रिलायन्स फाउंडेशनकडून असमच्या हस्तकलेला पाठिंबा
अंबानींनी रिलायन्स फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाचीही घोषणा केली. असमच्या समृद्ध हस्तकला आणि कलेला जागतिक स्तरावर पोहचवण्यासाठी रिलायन्स फाउंडेशन आणि स्वदेश सोर्स संयुक्तपणे काम करणार आहेत. विशेषतः सुआलकुची या असमच्या सिल्क उद्योग केंद्राचा विकास करून बांबू उत्पादन आणि सिल्क उद्योगाला नवे पंख देण्याचा मानस आहे.
अॅडव्हान्टेज असम समिट २.० चे उद्घाटन
अॅडव्हान्टेज असम समिट २.० चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे करण्यात आले. असमच्या औद्योगिक विकासासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.