आधीच्या सूचनेत अपडेट
5 जानेवारी 2026 रोजी केंद्र सरकारने इराणमधील आंदोलनांदरम्यान भारतीयांना सतर्कतेचा इशारा दिला होता. आता परिस्थिती अधिक चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर ही सूचना पुढे वाढवण्यात आली आहे.
दूतावासाच्या निवेदनात नमूद आहे की सध्या इराणमध्ये असलेले विद्यार्थी, यात्रेकरू, व्यावसायिक आणि पर्यटक यांनी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून देश सोडण्याची तयारी करावी. आंदोलनस्थळे आणि निदर्शनांच्या भागांपासून दूर राहावे, स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे आणि दूतावासाशी सातत्याने संपर्कात राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
कागदपत्रे जवळ ठेवा, नोंदणी करा
भारतीय नागरिकांनी पासपोर्ट, व्हिसा, ओळखपत्रांसह सर्व महत्त्वाची कागदपत्रे नेहमी जवळ ठेवावीत, असा विशेष सल्ला देण्यात आला आहे. ज्यांनी अद्याप दूतावासात नोंदणी केलेली नाही, त्यांनी अधिकृत ऑनलाइन पोर्टलवर तात्काळ नोंदणी करावी. इंटरनेट सेवा खंडित झाल्यास भारतातील नातेवाईकांनी त्यांच्या वतीने नोंदणी पूर्ण करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आपत्कालीन मदतीसाठी दूतावासाने हेल्पलाईन क्रमांक आणि अधिकृत ई-मेल जाहीर केले आहेत:
मोबाईल क्रमांक:
+989128109115
+989128109109
+989128109102
+989932179359
ई-मेल: cons.tehran@mea.gov.in
अमेरिका–इराण तणाव पुन्हा टोकाला
ही सूचना अमेरिका आणि इराण यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अणुकार्यक्रमावरून कठोर भूमिका घेतली असून, आवश्यक असल्यास मर्यादित लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिल्याची माहिती अमेरिकन माध्यमांनी दिली आहे.
‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तानुसार इराणने अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता सोडली नाही तर सुरुवातीला मर्यादित हल्ला करून अमेरिकेची भूमिका स्पष्ट करण्याचा पर्याय ट्रम्प प्रशासन विचारात घेत आहे. राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरल्यास कारवाईचा व्याप्ती वाढवण्याची शक्यता नाकारलेली नाही.
दरम्यान दोन्ही देशांतील पुढील चर्चेची फेरी गुरुवारी जिनिव्हा येथे होणार असल्याची माहिती ओमानचे परराष्ट्रमंत्री बद्र अल-बुसैदी यांनी दिली आहे. हल्ल्यापूर्वी तोडगा निघावा, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
देशांतर्गत अस्वस्थता कायम
इराणमध्ये गेल्या महिन्यातील व्यापक आंदोलनांनंतर वातावरण अद्याप तणावपूर्ण आहे. अलीकडेच काही विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केल्याच्या बातम्या समोर आल्या. या आंदोलनांवर सरकारने कठोर कारवाई केल्याचे वृत्त स्थानिक तसेच परदेशी माध्यमांनी दिले आहे.
या सर्व घडामोडींमुळे पश्चिम आशियातील परिस्थिती अस्थिर बनली असून त्याचा परिणाम इराणमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भारतीयांनी सतर्क राहावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
