जालना : महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली एकूण 288 जागांसाठी 4140 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी कोणत्या पक्षाचे सरकार येणार आणि आपल्या मतदारसंघांमध्ये कोण आमदार होणार ही चर्चा पाहायला मिळतील. विविध संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमधून देखील काहीसं चित्र स्पष्ट होत आहे. अनेक ठिकाणी काटे की टक्कर लढती झाल्या. त्यापैकीच एक म्हणजे मराठवाड्यातील जालना विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसकडून कैलास कोरंट्याल तर शिवसेना शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर निवडणुकीच्या रिंगणात होते. जालनेकरांच्या मनातील आमदार कोण हे आम्ही मतदारांकडून जाणून घेतलं पाहुयात.
advertisement
जालना विधानसभेसाठी कैलास गोरंट्याल हेच आमदार होतील. कारण त्यांनी पाच वर्षात चांगली काम केली आहेत. जालना शहराचा पाणी प्रश्न, शहरातील रस्ते असे विविध विकासकामे त्यांनी केली असल्याने तेच पुन्हा आमदार होतील असा विश्वास सिंधी काळेगाव येथील गणेश खरात यांनी व्यक्त केला. तर जालना शहरामध्ये अर्जुन खोतकर यांनी पदावर नसताना दोनशे ते तीनशे कोटी रुपयांची कामे आणले. शहराचा पाणी प्रश्न रस्त्यांचा प्रश्न त्यांनी सोडवला आणखीही बरीच विकास कामे केली. यामुळे अर्जुन खोतकर हेच आमदार होतील, असं यादवराव राऊत यांनी सांगितलं.
माझ्या मनातील आमदारकी कैलास गोरंट्याल आहेत. त्यांनी 90 किमी अंतराहून जायकवाडी येथून जालना शहरासाठी पाण्याची पाईपलाईन मंजूर केली. त्यामुळेच त्यांना जलसम्राट देखील म्हटलं जातं. शहरातील मेडिकल कॉलेजचा प्रश्न देखील सत्तेत नसताना त्यांनी मार्गी लावला. जालना शहरात विद्यापीठ व्हावं यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यामुळे तेच आमदार होतील अशी भावना युवराज राठोड यांनी व्यक्त केली. तर माणगाव येथील संतोष डेंगळे यांनी अर्जुन खोतकर हेच माझ्या मनातील आमदार असल्याचे सांगितलं.
अजून खोतकर यांनी सत्तेत नसताना चारशे कोटींचा निधी आणला मार्केट कमिटी चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठी मार्केट कमिटी जालना शहरात आहे. ग्रामीण भागामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. अर्जुन खोतकर हे किमान 20 हजार मतांच्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास संतोष डेंगळे यांनी व्यक्त केला.





