जबाब नोंदवून झाल्यानंतर मुलगी न्यायालयाच्या आवारात बाहेर आली आणि समोरच तिची आई उभी होती. डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि थरथरत्या आवाजात ती सतत एकच मागणी करत होती. माझ्या मुलीला माझ्या ताब्यात द्या… मला माझं लेकरू द्या!” आईचा तो आक्रोश संपूर्ण परिसरात घुमत राहिला. क्षणभर सगळे वातावरण स्तब्ध झाले. मात्र, या सगळ्या भावनिक वातावरणातही मुलगी विलक्षण शांत होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भावना दिसत नव्हती. डोळ्यांत अश्रू नव्हते. आईकडे न पाहता मुलगी थेट पोलिसांच्या गाडीकडे धावत गेली.
advertisement
नेमकं काय घडलं?
भिगवण येथे 21 वर्षीय तरुणीचे तिच्या आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून तीव्र आंदोलन केले. आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. भिगवण बंदची हाक देण्यात आली आणि त्याला नागरिकांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. दरम्यान, भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्याची तयारी सुरू होती.
तरुणीचे प्रतिज्ञापत्रही सोशल मीडियावर व्हायरल
मात्र त्यापूर्वीच तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये “माझे अपहरण झाले नसून मी स्वतःच्या इच्छेने गेले आहे,” असे तरुणीने म्हटले आहे. मात्र हा व्हिडिओ दबावाखाली काढल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. गुरुवारी मध्यरात्री संबंधित तरुण-तरुणी बारामती शहर पोलीस स्टेशनला हजर झाले. याच दरम्यान तरुणीचे प्रतिज्ञापत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
आईचं काय म्हणणे आहे?
एकीकडे तरुणी स्वतःच्या इच्छेने गेल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे तिच्या आईने “माझी मुलगी पळून गेलेली नाही, तिला जबरदस्तीने नेण्यात आले,” असा आरोप केला आहे. दोघांचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तरुणी आणि तिच्या आईच्या विधानांमध्ये तफावत असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह यांनी दिली आहे.
चौकशीतून नेमके सत्य काय समोर येणार?
दरम्यान, न्यायालयासमोर दंड प्रक्रिया संहिता कलम 164 अंतर्गत नोंदवलेल्या जबाबात तरुणीने आईकडे जाण्यास नकार दिला आहे. सध्या तिला सुधारगृहात ठेवून समुपदेशन केले जाणार आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, पुढील चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
