मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळच्या मुंबईतील कफ परेड परिसरातील रहिवासी आहेत. २१ मार्च रोजी सायंकाळी त्या खरेदीसाठी तुळशीबाग परिसरात आल्या होत्या. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या निमित्ताने बाजारपेठेत मोठी गर्दी होती. यावेळी संबंधित महिलेने आपले सोन्याचे दागिने सुरक्षित राहतील या हेतूने ते अंगावर न घालता पर्समध्ये ठेवले होते. मात्र, गर्दीचा फायदा घेत अट्टल चोरट्याने हातचलाखीने त्यांच्या पर्सची चैन उघडून दीड लाखांचे दागिने लंपास केले.
advertisement
खरेदी करताना अचानक आपली पर्स रिकामी असल्याचे लक्षात येताच महिलेला मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने विश्रामबाग पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गांभीर्यपूर्वक दखल घेतली असून, गर्दीच्या ठिकाणी वावरणाऱ्या 'पाकीटमारांच्या' टोळीचा शोध सुरू केला आहे.
तुळशीबाग आणि लक्ष्मी रोड सारख्या गजबजलेल्या ठिकाणी खरेदीला जाताना महिलांनी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी आणि दागिने पर्समध्ये ठेवण्यापेक्षा ते सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
