नेमकी घटना काय?
पूजा पवार ही ८ मार्च रोजी आपल्या ११ महिन्यांच्या मुलगा 'यश' याच्यासह घरातून निघून गेली होती. तिचे पती रवींद्र पवार यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. दरम्यान, पूजाने दुसऱ्या एका व्यक्तीशी तिसरे लग्न केले आणि त्या लग्नाचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. हा फोटो पती रवींद्र यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मुलाबद्दल विचारणा केली, पण पूजाने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे संशय बळावल्याने रवींद्र यांनी ५ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेतली.
advertisement
असा उघड झाला गुन्हा
पोलिसांनी पूजाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, सुरुवातीला तिने मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर तिने गुन्ह्याची कबुली दिली. "मुलगा सतत रडतो आणि मला पुढील आयुष्यात लग्न करायचे असल्याने तो अडथळा ठरू शकतो," या विचारातून तिने मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मुलाचा मृतदेह एका बॅगेत भरून विहिरीत फेकून दिला.
या भीषण गुन्ह्याचा छडा लावल्यानंतर पोलिसांनी विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पुरावे गोळा केले आहेत. एका आईनेच आपल्या मुलाचा अशा प्रकारे बळी घेतल्याने संपूर्ण शिरूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
