नेमकी घटना काय?
मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा एक ज्वालाग्रही गॅसचा (प्रोपोलिन) टँकर आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. या अपघातानंतर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तात्काळ मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद केली होती. मध्यरात्रीनंतर एका लेनवरून वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाला़.
advertisement
वाहनांच्या लांबच लांब रांगा
या घटनेमुळे एक्सप्रेसवेवर वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. एक्सप्रेसवे बंद असल्यामुळे वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून वळवण्यात आली आहे, मात्र तिथेही लोणावळ्यात प्रचंड भार आल्याने वाहने जागेवरच ठप्प आहेत. प्रवाशांना तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडावे लागत आहे.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना:
जोपर्यंत गॅस गळती पूर्णपणे थांबत नाही आणि रस्ता सुरक्षित होत नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवेवरून प्रवास करू नका. मुंबई किंवा पुण्याला जाणे अनिवार्य असल्यास रेल्वेचा पर्याय वापरावा किंवा जुन्या महामार्गावरील कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे. अग्निशमन दल आणि महामार्ग पोलीस गॅस गळती थांबवण्यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्न करत आहेत.
महामार्ग पोलिसांचे आवाहन:
"गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने कोणताही धोका पत्करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत यंत्रणा 'क्लिअरन्स' देत नाही, तोपर्यंत एक्सप्रेसवे बंद राहील. प्रवाशांनी सहकार्य करावे आणि शक्य असल्यास आजचा प्रवास रद्द करावा," असे आवाहन महामार्ग सुरक्षा पथकाकडून करण्यात आले आहे.
