तंत्रज्ञानाने दिला मृत्यूचा सांगावा
मृत सिद्धांत आल्हाट याच्या मोबाईलमध्ये 'इमर्जन्सी अलर्ट'साठी मित्र सार्थक तुपे याचा क्रमांक सेव्ह होता. बुधवारी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी सार्थकला अचानक एक मेसेज आला "सिद्धांतची कार क्रॅश झाली आहे." हा मेसेज पाहताच सार्थकच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने तातडीने दुसऱ्या कारमधील मित्रांशी संपर्क साधला. अवघ्या 15 मिनिटांत मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
advertisement
सोबत जाण्याचा होता आग्रह
"मित्रांनी मलाही सोबत येण्यासाठी खूप आग्रह केला होता, पण वैयक्तिक कारणांमुळे मी जाऊ शकलो नाही," असे सांगताना सार्थकचे डोळे पाणावले. तीन कारमधून हे सर्व मित्र पर्यटनासाठी गेले होते. दोन कार महामार्गावर थांबल्या असताना, पुढे गेलेल्या सिद्धांतच्या कारला काळाने गाठले.
या घटनेमुळे संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून, एका इमर्जन्सी मेसेजमुळे अपघाताची माहिती तातडीने मिळाली खरी, पण त्याने दिलेल्या जखमा कधीही न भरून येणाऱ्या आहेत.
कुणाल चोरडिया (२५, रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृतांची नावे आहेत. २७ तारखेला हे तीन तरुण फॉर्च्यूनर कारमधून उत्तर भारताच्या सहलीवर गेले होते. परतीच्या प्रवासात राजस्थानमधील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
