६ वर्षांचे प्रेमसंबंध आणि छळाचा शेवट
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृत मुंजा आणि ४० वर्षीय उषा चव्हाण यांचे गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही काळापासून मुंजा हा उषाला सतत मारहाण आणि मानसिक त्रास देत होता. प्रियकराच्या या जाचाला उषा कंटाळली होती. तिने आपली ही व्यथा मुलगा निखिलला सांगितली. आईच्या डोळ्यांतील पाणी पाहून निखिलचा राग अनावर झाला आणि त्याने मुंजाचा 'काटा' काढण्याचे ठरवले.
advertisement
मद्यप्राशन, हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
७ जानेवारी रोजी या खुनाचा कट रचण्यात आला. उषाने मुंजाला भेटायला बोलावले, तिथून निखिल आणि त्याचा मित्र स्वप्नील पारधी त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने एका निर्जन ठिकाणी घेऊन गेले. मुंजा नशेत असताना या दोघांनी त्याच्यावर चॉपरने सपासप वार केले. त्याची ओळख पटू नये म्हणून आरोपींनी क्रूरतेचा कळस गाठत दगडाने त्याचा चेहरा ठेचला आणि ओळखपत्र घेऊन पसार झाले. ११ जानेवारी रोजी चाकण पोलिसांना मुंजाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळला.
सीसीटीव्ही आणि दारूच्या बाटलीने उघडले गुपित
या गुन्ह्याचा छडा लावणे पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या आणि सिगारेट सापडली. तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानांचे फुटेज तपासले. खराबवाडी येथील एका दुकानात ७ जानेवारीच्या पहाटे ३ तरुण दारू खरेदी करताना दिसले. त्यातील एकाच्या दुचाकीचा क्रमांक शोधून काढताच या संपूर्ण हत्याकांडाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले.
आता उपायुक्त मारुती जगताप आणि पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
