टोळीयुद्धाची ठिणगी आणि खुनाचा कट
या प्रकरणाची पाळेमुळे ऑक्टोबर २०२४ मधील एका हल्ल्यात आहेत. पर्वती परिसरात संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर शस्त्राने हल्ला झाला होता. या गुन्ह्यात गणेश रेणुसे याच्यासह अन्य आरोपींवर 'मकोका'अंतर्गत कारवाई झाली होती. अलीकडेच गणेश रेणुसे जामिनावर बाहेर आला. आपल्यावर पुन्हा हल्ला होईल, या भीतीने रेणुसेच्या नातेवाईकांनी साळुंखे याचा गेम करण्याचा 'आधीच' कट रचला. यासाठी त्यांनी गावठी पिस्तूल खरेदी केले आणि चेतन जाधव याच्याकडे हल्ल्याची जबाबदारी सोपवली.
advertisement
पोलिसांनी 'असा' उधळला कट
या खुनाच्या कटाची कुणकुण पोलीस अंमलदार सचिन माळवे आणि अमर पवार यांना लागली. माहिती मिळताच खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. दांडेकर पूल येथील मांगीरबाबा चौक परिसरात आरोपी चेतन जाधव संशयास्पदरित्या वावरत असताना पोलिसांनी त्याला झडप घालून ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळली. वेळेत माहिती मिळाल्याने संभाव्य हत्याकांड टळले आहे.
कारवाईचा बडगा
आरोपी जाधव याला अटक करून त्याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख आणि पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईमुळे दत्तवाडी आणि पर्वती परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
