सेंद्रिय शेती म्हणजे काय?
सेंद्रिय शेती म्हणजे रसायनांचा वापर न करता केलेली शेती. या पद्धतीत रासायनिक खते किंवा औषधे न वापरता शेणखत, कंपोस्ट, गांडूळ खत यांचा वापर केला जातो. मातीची सुपीकता टिकवून ठेवून नैसर्गिक पद्धतीने पिके घेतली जातात. त्यामुळे अन्न अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी मिळते. डॉ. प्रशांत नाईकवाडी यांनी सांगितलं की, गेल्या काही वर्षांपासून शेतीतील अनेक उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर केला जात आहे आणि याचे परिणाम देखील आपण भोगत आहोत. त्यामुळे आता सेंद्रिय शेतीकडे आणि उत्पन्नाकडे वळायला हवं.
advertisement
Shiv Jayanti 2026 : कलेतून उजळला स्वराज्याच्या विरांगनांचा इतिहास, हा Video पाहाच
तुम्ही सेंद्रिय भाजीपाला-फळे खरेदी करत असाल तर ते नक्की सेंद्रिय आहेत का? हे ओळखण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवा. सेंद्रिय भाजीपाला रासायनिक पिकांपेक्षा कमी आकर्षक असतो. त्याची चव आणि आकार थोडा वेगळा असतो. सेंद्रिय पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केली जात नाही, त्यामुळे कधीकधी पिकांवर कीड लागलेली किंवा डाग असतात. या बाबी लक्षात घेतल्यास सेंद्रिय उत्पादन सहज ओळखण्यास मदत होते.
या बाबी तपासणे महत्त्वाचे
भाजीपाला-फळे खरंच सेंद्रिय आहेत की नाही, तंतोतंत ओळखण्यासाठी उत्पादनाचे सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण असणे आवश्यक असल्याचं डॉ. प्रशांत यांनी सांगितलं. सेंद्रिय शेती प्रमाणीकरण धोरणानुसार काही संस्था शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तपासणी करतात की, शेतात रसायनांचा वापर होत आहे का? कीटकनाशक वापरले जात आहेत का? आणि कोणती खते वापरली जात आहेत. त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या पिकाला सेंद्रिय शेतीचे प्रमाणपत्र दिलं जातं. त्यामुळे सेंद्रिय शेतमाल खरेदी करण्यापूर्वी तपासावे की त्याला नॅशनल प्रोग्राम फॉर ऑरगॅनिक प्रॉडक्शन (एनपीओपी) किंवा पार्टीसिपटोरी गॅरंटी सिस्टिम (पीजीएस) चे प्रमाणपत्र आहे का. प्रमाणपत्रावर संस्थेचा लोगो किंवा क्रमांक आहे का तेही पाहावे. शेतमालावर उत्पादकाचे नाव, पत्ता आणि प्रमाणपत्र देणाऱ्या संस्थेचे नाव व पत्ता तपासून बघा.





