रवींद्र उद्धव भालेराव (वय ६१) असे मृताचे नाव असून, त्यांचा मुलगा सागर (वय २८) याने हा अघोरी प्रकार केला. भालेराव हे सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाप-लेक दोघांनाही दारूचे व्यसन होते. शनिवारी (७ फेब्रुवारी) रात्री दोघेही नशेत असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर रागात झाले आणि सागरने घरातील पेट्रोल वडिलांच्या अंगावर ओतून त्यांना पेटवून दिले.
advertisement
पाच दिवस मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
वडिलांनी पेट घेतल्यावर सागरला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला आणि त्याने स्वतः आग विझवून त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत रवींद्र भालेराव हे ५० टक्क्यांहून अधिक भाजले होते. गेल्या पाच दिवसांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते, मात्र मंगळवारी (११ फेब्रुवारी) मध्यरात्री त्यांची ही झुंज संपली.
पर्वती पोलिसांत खुनाचा गुन्हा
सुरुवातीला या प्रकरणी गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा होता, मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सागरवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुभाष महाले करत आहेत. एका क्षणाच्या रागाने आणि नशेच्या विळख्याने हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त केल्याची ही धक्कादायक घटना सगळ्यांनाच हादरवून टाकणारी आहे.
