नेमकं प्रकरण काय?
पूजा आणि संकेत (नावे बदललेली) हे वेगवेगळ्या जातीचे तरुण-तरुणी एकाच परिसरात राहत होते. प्रेमात पडल्यानंतर त्यांनी घरच्यांच्या विरोधाची भीती असल्याने १९ एप्रिल २०२४ रोजी पळून जाऊन कायदेशीर विवाह केला. मात्र, लग्नानंतर 'साथिया' चित्रपटाप्रमाणे दोघेही आपापल्या घरी राहू लागले. जेव्हा मुलीने घरी लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा तिच्या घरून तीव्र विरोध झाला. घरच्यांच्या दबावापुढे झुकलेल्या पूजाने अखेर संकेतसोबत राहण्यास नकार दिला आणि न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला.
advertisement
पतीने लावली 'ही' अट
संकेत मात्र पूजाला नांदवायला तयार होता. न्यायालयाने त्यांचे समुपदेशन केले, पण पूजा आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर संकेतचे वकील ॲड. नीता भवर यांनी न्यायालयात बाजू मांडली की, कारण नसताना पतीला कोर्टात खेचल्यामुळे त्याचा वेळ आणि पैसा वाया गेला आहे. त्यामुळे जर पत्नीला घटस्फोट हवा असेल, तर तिनेच पतीला खटल्याचा खर्च म्हणून ५० हजार रुपये द्यावेत.
न्यायालयाचा निकाल
पूजाने ही अट मान्य केली आणि पतीला ५० हजार रुपये सुपूर्द केले. त्यानंतर अवघ्या एका दिवसात त्यांचा घटस्फोट मंजूर झाला. घाईघाईत आणि घरच्यांना न सांगता लग्न करणाऱ्या प्रेमी जोडप्यांसाठी ही घटना एक मोठा धडा मानली जात आहे.
