1. मिसळपाव : पुण्याची मिसळपाव म्हणजे अगदी जीव की प्राण. सकाळच्या नाश्त्यासाठी असो किंवा दर्शनानंतरची भूक भागवण्यासाठी, मिसळ हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. तिखट-पातळ रस्सा, वर टाकलेले चिवडा, फरसाण, कांदा आणि लिंबाचा रस – यामुळे मिसळपावाची चव एकदम वेगळी लागते. कसबा गणपती दर्शनानंतर पुण्यातील प्रसिद्ध बेडेकर मिसळ किंवा काटा किर्र मिसळ चाखायलाच हवी.
advertisement
2. वडा-पाव : मुंबईचा वडा-पाव जितका लोकप्रिय आहे, तितकाच पुण्यातील वडा-पावही लोकांना वेड लावतो. बाहेरून खरपूस आणि आतून गरमागरम बटाट्याचा वडा, सोबत तिखट-गोड चटणी आणि हिरवी मिरची. एवढं साधं असलं तरी पोटभरीचं जेवण बनतं. शनिवारवाडा किंवा लक्ष्मीरोडवर दर्शन संपवून निघालात, तर रस्त्यावरच्या वडा-पावच्या गाड्या तुमचं लक्ष नक्की वेधून घेतील.
3. मस्तानी : पुण्यात गणेशोत्सव म्हणजे मिरवणुकीचा जल्लोष, पण त्याचबरोबर मस्तानीशिवाय पुण्याचा अनुभव अपुरा राहतो. दाटसर मिल्कशेकवर टॉपिंग म्हणून सुकामेवा, फळे आणि आईस्क्रीम घातलेलं मस्तानी हे पुण्यातलं खास पेय आहे. सुजाता मस्तानी आणि बाबू मस्तानी या ठिकाणी वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये मस्तानी मिळते. दर्शनानंतर गोडसर, थंडगार मस्तानी प्यायली की थकवा दूर होतो.
4. भेळपुरी आणि रगडा-पटिस : गणेशोत्सवात पुण्यातील रस्त्यावरच्या खाऊगल्ल्या चैतन्याने गजबजलेल्या असतात. फरसाण, कांदा, बटाटा, चटणी यांचा उत्तम संगम म्हणजे भेळपुरी. तर रगडा-पटिस हा थोडा झणझणीत, चविष्ट आणि तृप्त करणारा पदार्थ आहे. शनिवारवाडा, लक्ष्मीरोड, किंवा अण्णा पवार खाऊगल्लीत भेळ-रगड्याचे स्टॉल्स कायम गजबजलेले दिसतात.
5. महाराष्ट्रीयन थाळी : पुण्यात गणपती दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी जरूर चाखावी. पुरणपोळी, भाजी, आमटी, वरण-भात, पापड, लोणचं अशा अनेक पदार्थांनी सजलेली थाळी भूक भागवतेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीची खरी ओळखही करून देते. श्यामसुंदर, आलनकर किंवा श्रीदत्त भोजनालय ही ठिकाणं खास थाळीसाठी प्रसिद्ध आहेत.
6. बाकरवडी : पुण्यातील चितळे बंधूंची बाकरवडी ही जगप्रसिद्ध आहे. कुरकुरीत, मसालेदार आणि गोडसर अशी ही स्नॅक आयटम दर्शनाला आलेल्या भाविकांनी नक्कीच चाखावी. फक्त चाखायचीच नाही तर घरी जाताना बाकरवडीचे पॅकेट घेऊन जाणं ही अनेकांची परंपरा झाली आहे.