मध्यरात्री पुण्यात घडलं भयंकर
हडपसर परिसरात कामगार वास्तव्यास असलेल्या बांबू आणि पत्र्याच्या शेडना मध्यरात्री अचानक आग लागली. गाढ झोपेत असलेल्या कामगारांना काही कळायच्या आत आगीने रौद्र रूप धारण केलं होतं. बांबू आणि लाकडी सामान असल्याने आगीने अवघ्या काही मिनिटांत एका घराकडून दुसऱ्या घराकडे धाव घेतली. जीव वाचवण्यासाठी या कामगारांनी आपल्या चिमुकल्यांना कडेवर घेऊन बाहेर धाव घेतली खरी, पण पाठीमागे त्यांचा आयुष्यभराचा घाम जळून खाक होत होता.
advertisement
डोळ्यादेखत संसाराची राख रांगोळी
"आमच्या डोळ्यादेखत आमचा संसार जळत होता, पण आम्ही काहीच करू शकलो नाही," अशी आर्त हाक तिथल्या महिलांनी दिली. घरामध्ये असलेलं धान्य, कपडे, मुलांची पुस्तकं आणि साठवलेले थोडे-थोडके पैसे सगळं काही या आगीत जळून खाक झाले. सकाळी जिथे हसती-खेळती घरं होती, तिथे आता फक्त जळालेल्या पत्र्यांचा ढिगारा आणि कोळसा उरला आहे.
मोठं नुकसान, पण देवाची कृपा
या भयानक आगीत १९ घरांचं अतोनात आर्थिक नुकसान झालं आहे. कपड्याच्या एका सुतापासून ते घरगुती सामानापर्यंत काहीही शिल्लक उरलेलं नाही. मात्र, एवढ्या मोठ्या संकटातही एकच दिलासादायक बाब म्हणजे, या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आगीचा भडका उडण्यापूर्वीच लोकांनी सुरक्षित बाहेर धाव घेतल्याने कोणालाही इजा झाली नाही.
आगीचं कारण अस्पष्ट
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की इतर काही कारणाने, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
