नेमकी घटना काय?
चैतन्य चव्हाण असं मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी (डोंगरगाव) येथील रहिवासी होता. तो पुण्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील वॉटर फिल्टरमधून पाणी घेत असताना चैतन्यला अचानक जोरदार विजेचा धक्का लागला. शॉक लागताच तो जागीच कोसळला.
advertisement
या घटनेनंतर वसतिगृहातील इतर विद्यार्थ्यांनी तातडीने धाव घेत चैतन्यला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. चैतन्यच्या निधनाची बातमी समजताच त्याच्या कुटुंबावर आणि गावावर शोककळा पसरली आहे. एका होतकरू तरुणाचा अशा प्रकारे अंत झाल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचे आक्रमक आंदोलन
या घटनेनंतर कृषी महाविद्यालयातील वातावरण चांगलंच तापलं आहे. वसतिगृहातील सोयी-सुविधांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच चैतन्यचा बळी गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. "महाविद्यालयाने या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी," या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारात जोरदार आंदोलन सुरू केलं आहे.
