ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या अखेरपर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये रात्रीचे तापमान स्थिर राहील. मात्र जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर वाढल्याने थंडीचा कडाका पुन्हा वाढेल. हवामान विभागाच्या गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, २०१८ मध्ये डिसेंबरमधील नीचांकी तापमान ५.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. तर गेल्या वर्षी ते ८.७ अंशांपर्यंत खाली आले होते. यंदाही थंडीचा हा आल्हाददायी प्रभाव दीर्घकाळ टिकून राहण्याचे संकेत मिळत असून, दिवसाच्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा आढावा घेतला असता, गेल्या दोन दिवसांत तिथे थोडी वाढ झाली असली तरी थंडीचा प्रभाव ओसरलेला नाही. गुरुवारी राज्यामध्ये अहिल्यानगर येथे ८.५ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ यांसारख्या शहरांतही पारा १० ते १२ अंशांच्या दरम्यान आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. एकंदरीत, जानेवारीच्या सुरुवातीपर्यंत राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळतील आणि त्यानंतर कडाक्याची थंडी पुनरागमन करेल, असे चित्र स्पष्ट होत आहे.
